
CM Devendra Fadnavis: 'बीडीडी चाळ' हा प्रकल्प...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रशासनाला महत्वाची सूचना
विकास प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला पायाभूत विकास प्रकल्पाचा आढावा 
मुंबई पुणे मिसिंग लिंकचे काम लवकर पूर्ण करण्यात येणार
मुंबई : राज्यातील सुरू असलेले विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावेत, हे प्रकल्प सुरू असताना येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करण्यात याव्यात तसेच नवीन प्रकल्प दोन ते अडीच वर्षात पूर्ण झाले पाहिजे, असे नियोजन करण्यात यावे. विविध विकास प्रकल्प तयार करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बीडीडी चाळ हा अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचनाही त्यांनी केली.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई मेट्रो लाईन 2 – बी ही डी.एन.नगर ते डायमंड गार्डन-मंडाले या मार्गाने धावणार असून यात 19 स्टेशन्स असणार आहे. हा मेट्रो प्रकल्प 31 मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्वामी समर्थनगर ते विक्रोळी ही मेट्रो लाईन 31 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात यावी. याकरिता नगरविकास विभागाने श्याम नगर स्टेशन येथील जमिनीसंदर्भातील अडचणी 15 दिवसात सोडवाव्यात. शिवडी ते वरळी हा जोडमार्ग प्रकल्प दिवसरात्र कामे करून पूर्ण करण्यात यावा. जे प्रकल्प मागे पडले ते वेळेत कसे पूर्ण होतील, यासाठी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराने लक्ष देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणामार्फत मान-हिंजेवाडी-शिवाजीनगर या मेट्रो लाईन 3 चे कामकाज 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. नायगाव येथील बीडीडी चाळ प्रकल्प जून 2029 पर्यंत पूर्ण तर वरळी येथील प्रकल्प मे 2029 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. मुंबईतील एन. एम. जोशी बीडीडी चाळ प्रकल्प हा जून 2031 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘बीडीडी चाळ’ प्रकल्पास अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची सूचना केली.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणामार्फत वडपे-ठाणे हा 23.8 कि.मी. रस्ता बांधकाम सुरू असून यातील 19 किमीचा रस्ता तयार झाला असून संपूर्ण रस्ता मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. हा रस्ता समृद्धी महामार्गासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे, ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ
त्याचबरोबर मुंबई पुणे मिसिंग लिंकचे काम लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. वांद्रे -वर्सोवा सी लिंक प्रकल्पाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. हा प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेळेत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.