एलपीजी गॅस तुटवड्याविरोधात कॉंग्रेसचे चुल पेटवून वाईमध्ये आंदोलन केले (फोटो - टीम नवराष्ट्र)
Satara News : वाई: केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींनी उच्चांक गाठला असून, सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यातच आता आखाती देशातील युद्धाचे कारण पुढे करून घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरचा (LPG Gas) पुरवठा विस्कळीत झाल्याने गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या अन्यायी दरवाढीचा आणि विस्कळीत पुरवठ्याचा निषेध करण्यासाठी वाई तालुका काँग्रेस व महिला काँग्रेसच्या वतीने काल , सोमवार १६ मार्च २०२६ रोजी वाईत चूल पेटवा आंदोलन करण्यात आले. (Satara News)
वाईतील मुख्य किसनवीर चौकात काँग्रेसच्या महिला पदाधीकाऱ्यांनी चुली पेटवून त्यावर भाकरी आणि चहा बनवून अनोखे आंदोलन केले. नरेंदर सरेंडर, भाजपा सरकारचा जाहीर निषेध, काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा यावेळी देत सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.
हे देखील वाचा : US-Israel-Iran War Impact: शेतकऱ्यांना आर्थिक फटका! भाजी मार्केटवर युद्धाचं सावट, काकडी, दुधी, कारल्याचा साठा वाढला
यावेळी जिल्हा काँग्रेसच्या महिला जिल्हा अध्यक्षा सुषमा राजेघोरपडे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पिसाळ -देशमुख, तालुका कार्याध्यक्ष प्रदीप जायगुडे यांनी आपल्या मनोगतात केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाचा समाचार घेतला. यानंतर आंदोलनकर्त्यांनी मोर्च्याने तहसील कचेरीत जाऊन उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी सेवादलाचे तालुकाध्यक्ष काशिनाथ पिसाळ, महिला तालुकाध्यक्ष धनश्री मालुसरे, अनुसूचित जातीजमाती सेलचे संभाजी कांबळे, राजकुमार जगताप,प्रकाश शिंदे, अशोक नवघने, मंजिरीताई पानसे, फैय्याज बागवान, जयदीप शिंदे, प्रवीण क्षीरसागर, ज्योती जगताप, सचिन काटे, विहार पावसकर, गणपत फरांदे, शारदा पिसाळ यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
भाजीपाला बाजाराला बसला फटका
इराण-इस्रायल युद्धाची झळ आता थेट भाजी बाजाराला बसू लागली आहे. आखाती देशांना होणारी कच्च्या मालाची निर्यात पूर्णपणे थांबल्यामुळे, निर्यातीसाठी असलेला माल स्थानिक कृषी उत्पादन बाजारात पडून आहे. यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक प्रचंड वाढली असून, भावातही लक्षणीय घट झाली आहे. मात्र, दुसरीकडे, वाढत्या भावांमुळे विक्रेते चिंतेत आहेत, कारण ग्राहक घराबाहेर पडणे टाळत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, केवळ निर्यातबंदीमुळेच नाही, तर व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल उद्योगालाही फटका बसत आहे. हॉटेल्समध्ये भाजीपाल्याच्या पदार्थांचा वापर कमी झाल्यामुळे विक्रीत मोठी घट नोंदवली गेली आहे. यामुळे शेतकरी आणि व्यापारी या दोघांनाही दुहेरी फटका बसला आहे.
हे देखील वाचा : LPG Gas : “आपण हिंदुत्ववादी आहात ना… मग देवळांनातरी गॅस द्या; खासदार संजय राऊतांचे टीकास्त्र
भाजी विक्रेत्यांच्या मते, निर्यात पुन्हा सुरू झाली नाही तर पुढील काही दिवसांत दर आणखी घसरण्याची शक्यता आहे. बाजारात मालाचा साठा वाढत असल्याने विक्री कमी दरात करावी लागत आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी नव्याने माल खरेदी करताना सावध भूमिका घेतली असून, साठा कमी करण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान, परिस्थिती लवकर सुधारेल आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ पुन्हा खुली होईल, अशी अपेक्षा शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करत आहेत. अन्यथा भाजीपाल्याच्या दरातील ही घसरण कायम राहिल्यास उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.






