
थेट टोल प्लाझा जप्तीचाच न्यायालयाने दिला आदेश; ऐतिहासिक निर्णयाचीच आता सगळीकडे चर्चा...
वाशिम : राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन कमी दरात केल्याप्रकरणी वाशिम जिल्हा न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मोठा धक्का दिला. महामार्गासाठी संपादित जमिनीच्या दराचे सुधारित आदेश दिल्यानंतरही मोबदला दिला नाही. त्यावरून वाशिम जिल्ह्यातील धुमका-तोंडगाव टोल प्लाझा जप्त करण्याचा ऐतिहासिक आदेश मंगळवारी दिला.
शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे न मिळाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत न्यायालयाने शासकीय कामकाजावर जोरदार ताशेरे ओढले. राष्ट्रीय महामार्ग क. १६१ वर बेबी दिनकर गर्जे व मुलगा विठ्ठल यांची जांभरूण नावजी येथील राज्य महामार्ग ५१ वाशीम ते रिसोडलगत असलेले गट नं. ५५, ५६, ५७ मध्ये जमीन होती. ही जमीन अकृषक करण्यात आली होती. त्या जमिनीमधून नवीन वाशीम वळण मार्ग जात असल्याने भूसंपादन करण्यात आले. तत्कालीन भूसंपादन तथा उपविभागीय अधिकाऱ्यांनी अधिकृत केलेल्या प्लॉटचाच मोबदला दिला.
Travel News : निवृत्तीनंतर शांत आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर परदेशातील ही 6 ठिकाणं आहेत परफेक्ट
भूसंपादनामध्ये ले-आऊटमधील रस्ते, खुली जागा व सुखसोयीसाठी सोडलेल्या जागेचे देखील संपादन केले. मात्र, त्याची नुकसानभरपाई देण्यात आली नाही. त्यांनी भरपाईसाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन याचिका दाखल केली. त्यावर राज्य महामार्गाला लागून ले-आऊट असल्यामुळे वाढीव भाव व भूसंपादन केलेल्या रस्ते, खुली जागा व सुखसोयीच्या जमिनीची नव्या भावाने नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश दिले. भूसंपादनात कमी भाव दिलेल्या प्लॉटचा दर राज्य महामार्गावरील दराप्रमाणे वाढवून दिला. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आदेशाप्रमाणे रक्कम दिली नाही.
आदेशानंतरही रक्कम न मिळाल्याने न्यायालयात धाव
लवादाच्या आदेशानंतरही रक्कम न मिळाल्याने त्यांनी वाशीम जिल्हा न्यायालयात धाव घेऊन वसुलीसाठी ६ दरखास्ती दाखल केल्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांची जबाबदारी असूनही न्यायालयीन आदेशाप्रमाणे रक्कम भरली नाही. वाशीम जिल्ह्याच्या अधिकारक्षेत्रातील तोंडगाव धुमका टोल प्लाझा येतो. त्या टोलवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दररोज दोन ते तीन लाखापेक्षा जास्त रक्कम वाहनधारकांकडून वसूल करते.
टोल प्लाझा जप्तीची पहिलीच वेळ?
शेतकऱ्यांची नुकसानभरपाई वसूल होण्यासाठी न्यायालयाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचा टोल प्लाझा जप्त होण्याची ही देशातील पहिलीच वेळ असू शकते, असे पक्षकाराचे वकील अॅड. उदय देशमुख यांनी सांगितले. या प्रकरणामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर मोठी नामुष्की ओढवली.