
कोल्हापूर: राज्यामध्ये सध्या नवीन वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षण विभागाने (School Education Department) मध्यान्ह भोजनामध्ये (Mid-day meal) विद्यार्थ्यांना अंडी देण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे गटात असणारे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी घेतलेल्या या निर्णयाला भाजपकडून (BJP) विरोध केला जातो आहे. विद्यार्थ्यांना अंडी (Egg Delivery) देण्याच्या निर्णयावरुन भाजप जैन सेलने (BJP Jain Cell) आक्रमक भूमिका घेत केसरकरांना कडधान्याची पाकीट पाठवली आहेत.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. यामध्ये आता विद्यार्थ्यांना अंडी देखील देता येतील असा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. याकरिता स्थानिक बाजारातून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना अंडी आणि फळे घेता येणार आहेत. त्यासाठी पहिल्या सहा आठवड्यांच्या खर्चासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे ३० रुपये खर्च दिला जाणार आहेत. परंतु शालेय पोषण आहारात अंडी देऊ नये, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात येत आहेत.
भाजप जैन सेलकडून अंडी देण्यास तीव्र विरोध केला आहे, मंत्री केसरकर यांच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी भाजपा जैन सेल प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी कोल्हापूरमधून केसरकरांना कडधान्यांची पाकीट पाठवली आहेत. कोल्हापूर येथील पोस्ट ऑफिसमधून ही कडधान्याची पाकीट पाठवत अनोख्या पद्धतीने विरोध दर्शवण्यात आला आहे. हा अंडी वितरणाचा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभरातून दीपक केसरकर यांना मोठ्या संख्येने कडधान्याची पाकीटे पाठवण्याचा निर्धार भाजप जैन सेलने केला आहे. याचबरोबर भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक जणांच्या भावना दुखावल्या गेल्याची भावना व्यक्त केली आहे. यामुळे शिंदे गटाच्या मंत्र्यांविरोधात भाजपातील लोकांची नाराजी समोर आली आहे.