कॉर्पोरेट कंपन्यांनी दुर्गम व मागास जिल्ह्यांमध्ये काम करावे, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन (फोटो सौजन्य-X)
मुंबई : कॉर्पोरेट व खासगी संस्थांनी आपले सामाजिक उत्तरदायित्वाचे काम करताना शहरी भागावर लक्ष केंद्रीत न करता दुर्गम आणि विकासाच्या दृष्टीने मागास जिल्ह्यांमध्ये गुंतवणूक व सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम राबविण्यावर भर द्यावा. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तनाच्या नव्या टप्प्यात सर्वांनी एकत्र येत व्यापक आणि परिणामकारक परिवर्तन घडवून आणूयात, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या पाचव्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एसटीएल लिमिटेडने तयार केलेल्या जलसंधारण कामाच्या अहवालाचे प्रकाशन तसेच लातूर येथील रावसाहेब पाटील शेतकरी उत्पादक कंपनीच्या वेअर हाऊसचे ई अनावरण करण्यात आले. दर्जा व्यवस्थापनासंदर्भात क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया आणि व्हिएसटीएफ यांच्यात तसेच ‘हरित छत्रपती संभाजी नगर उपक्रम’ राबविण्यासंदर्भात एसटीएल, व्हिएसटीएफ व छत्रपती संभाजी नगर महापालिका, सामाजिक वनीकरण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, व्हीएसटीएफच्या पहिल्या टप्प्यात अनेक गावांमध्ये राबविलेल्या योजनांचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून त्याच्या मूल्यमापनाचे परिणाम उत्साहवर्धक आहे. या टप्प्यात काही त्रुटी राहिल्या असल्या तरी त्या सुधारून दुसऱ्या टप्पा अधिक प्रभावीपणे राबवून तो यशस्वी करू. ग्राम परिवर्तन उपक्रमाची अंमलबजावणी करताना व्हीएसटीएफचे फेलोज गावातून बाहेर पडल्यावर तेथील परिवर्तनाचा वेग मंदावल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या पुढील काळात गावातच उपलब्ध मनुष्यबळावर आधारित संस्थात्मक संरचना उभी करणे गरजेचे आहे. गावांमध्ये योजनांची अंमलबजावणी करताना प्रत्येक गावाची गरज ओळखून योजनांमध्ये बदल केल्यास परिवर्तनाची गती वाढेल.
व्हीएसटीएफ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात अनेक खासगी कंपन्यांनी व सामाजिक उत्तरदायित्व क्षेत्रातील भागीदारांनी केवळ आर्थिक सहाय्यच नव्हे तर धोरणात्मक बदल, नवी तंत्रज्ञान, डेटा आधारित प्रक्रिया आणि नाविन्यपूर्ण उपाय सुचवून शासनाच्या प्रयत्नांना बळकटी दिली. हे परिवर्तन केवळ योजना राबवणे नव्हे, तर गावात समर्पित व्यक्तींची उपस्थिती, सामाजिक बांधिलकीने काम करणारे फेलोज आणि स्थानिक पातळीवर संस्था उभ्या करण्यावर लक्ष केंद्रीत होते, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक खासगी भागीदारांचे योगदान अत्यंत मोलाचे असून, सरकारी योजनांची सखोल माहिती व सहयोगाने गावोगावी उत्तम परिणाम साधता आला आहे. व्हीएसटीएफ आणि भागीदार असलेल्या खासगी कंपन्यांमुळे ग्राम विकास परिवर्तनात चांगले काम झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘लखपती दीदी’ योजनेचा राज्यात मोठ्या प्रमाणावर लाभ झाला असून, केवळ दोन वर्षांत महाराष्ट्रात ५० लाख महिला ‘लखपती दीदी’ बनल्या आहेत. शासनाकडून त्यांना केवळ संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या असून त्याचे खरे श्रेय त्या महिलांचेच आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी टाटा ग्रुपचे अध्यक्ष नोवेल टाटा म्हणाले की, महाराष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी टाटा ग्रुप व टाटा ट्रस्ट नेहमीच राज्य शासनाला सहकार्य करेल. टाटा ग्रुपने सामाजिक उत्तर दायित्व निधीसाठी २० ते २५ टक्के वाटा ठेवला आहे. यामधून विदर्भ व इतर मागास भागातील सामाजिक, आर्थिक विकास क्षेत्रात काम करत आहे. याबरोबरच ग्रामविकास, जलसंधारण आदी क्षेत्रातही टाटा ग्रुप काम करत असून यासंदर्भात विविध शासकीय संस्थांबरोबर सामंजस्य करार केला आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधीसाठीही टाटा ग्रुप सहकार्य करत आहे. तसेच चंद्रपूर येथील कॅन्सर रुग्णालयासाठी निधी देत असून अमरावती व सोलापूरमधील शासकीय रुग्णालयालाही मदत करण्यात येत आहे.
जिंदाल ग्रुपच्या संगीता जिंदाल यांनी सांगितले की, जिंदाल समूहासाठी महाराष्ट्र हे राज्य महत्त्वाचे असल्याने राज्याच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेत आहोत. जिंदाल समूहाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील ५० गावांमध्ये परिवर्तनासाठी काम करणार आहे. त्याचबरोबर अलिबाग, चंद्रपूर जिल्ह्यासारख्या ठिकाणीही सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून कामे हाती घेणार आहे.
आयडीबीआयचे व्यवस्थापकीय संचालक राकेश शर्मा म्हणाले की, आयडीबीआयच्या व्यवसायात महाराष्ट्राचा मोलाचा वाटा आहे. व्हीएसटीएफच्या सहकार्याने पाच जिल्ह्यातील १०४ गावांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवित आहोत. तसेच शासकीय रुग्णालयांच्या मदतीसाठी निधी देण्यात येत आहे. तसेच प्रत्येक ब्रँच गावातील एक शाळा व विभागीय कार्यालये ही प्रत्येकी एक रुग्णालय दत्तक घेऊन त्या ठिकाणी काम करणार आहे.
यावेळी परदेशी यांनी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या पहिल्या टप्प्यातील कामकाजाची माहिती दिली. तसेच त्यामुळे झालेल्या परिवर्तनाचा आढावा सादर केला. सोलापूर व धाराशिव जिल्ह्यात ग्राम विकासासाठी मिशन महा कर्मयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम राज्यातील सर्वच जिल्ह्यात राबविण्यात यावा. मिशन कर्मयोगी उपक्रमाच्या माध्यमातून गावातील ग्रामस्तरावरील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात यावे, असे परदेशी यांनी यावेळी सांगितले.