
ग्रामीण भागात कुक्कुटपालनाची 'भरारी'; नोकरीपेक्षा व्यवसायाकडे युवकांचा ओढा!
राजेगाव : ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी आता ‘कुक्कुटपालन’ हा केवळ शेतीपूरक व्यवसाय न राहता एक मुख्य उत्पन्नाचा स्रोत बनला आहे. शहरांमध्ये रोजगाराच्या संधी मर्यादित झाल्याने आणि मंदीच्या सावटामुळे गावातील तरुणांनी आता शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसायाला मोठी पसंती दिली आहे. नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा ‘मालक’ होण्याकडे कल वाढला आहे. गेल्या काही वर्षांत सरकारी आणि खासगी क्षेत्रातील नोकरभरती मंदावली आहे.
उच्च शिक्षण घेऊनही हाती ठोस काम नसल्याने ग्रामीण भागातील तरुण हताश न होता स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. “दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केलेला बरा,” अशी मानसिकता आता युवकांमध्ये रुजत आहे. अल्प भांडवलात आणि घरच्या घरी सुरू करता येणारा व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाकडे पाहिले जात आहे.
कमी जागेत जास्त उत्पन्न
हा व्यवसाय करण्यासाठी खूप मोठ्या जमिनीची आवश्यकता नसते. यासाठी शासकीय योजनांचा आधार: राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांमार्फत कुक्कुटपालनासाठी ५०% ते ७५% पर्यंत अनुदान दिले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बंदिस्त शेड, स्वयंचलित खाद्याची यंत्रणा यामुळे कष्ट कमी झाले आहेत. गावरान आणि बॉयलर कोंबड्या आणि अंडी यांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे. हॉटेल व्यवसाय, घरगुती वापर आणि जिमला जाणाऱ्या युवकांमुळे अंड्यांचा खप प्रचंड वाढला आहे. बॉयलर कोंबड्यांच्या तुलनेत गावरान किंवा कावेरी, कडकनाथ सारख्या जातींचे पालन करून तरुण महिना वीस ते चाळीस हजार रुपये सहज कमवत आहेत.
आव्हाने आणि संधी मात्र, हा व्यवसाय करताना केवळ हौस महत्त्वाची नाही, तर तांत्रिक ज्ञानही आवश्यक आहे. कोंबड्यांवरील रोगराई, लसीकरण आणि खाद्याचे वाढते दर ही काही प्रमुख आव्हाने आहेत. तरीही, योग्य व्यवस्थापन केल्यास हा व्यवसाय तोट्यात जात नाही, असा विश्वास यशस्वी युवा पोल्ट्री फार्मर्सनी व्यक्त केला आहे.
“शहरात तिस चाळीस हजारांची नोकरी करण्यापेक्षा गावात स्वतःचा पोल्ट्री व्यवसाय सुरू करून मला भरपूर फायदा मिळत आहे. युवकांनी या व्यवसाकडे अधिक वळले पाहिजे, मला या व्यवसायाने मोठी साथ दिली आहे.” – अमोल जगदाळे, पोल्ट्री व्यवसायीक