अहमदनगर : धनगर आरक्षणासाठी (Dhangar Reservation) चौंडी येथे सुरू असलेले उपोषण 21 व्या दिवशी मागे घेण्यात आले आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची शिष्टाई यशस्वी ठरली. अहमदनगरमधील चौंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने (Yashwant Sena) उपोषण सुरू होते. धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीतील आरक्षणाच्या (ST Reservation) अंमलबजावणीसाठी आंदोलन सुरू आहे.
आदिवासी प्रवर्गातून आरक्षण द्यावे
धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. त्या मागणीसाठी मागील 20 दिवसांपासून अहमदनगर येथील चौंडीमध्ये उपोषण आंदोलन सुरू आहे. आज 21 व्या दिवशी उपोषणकर्ते सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर या दोघांचीही प्रकृती बिघडली. काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आंदोलकांशी फोनवरुन चर्चा करत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे.
चौंडीत उपोषणकर्त्यांशी चर्चा
दरम्यान आज मंत्री गिरीश महाजन हे चौंडीत उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी आले होते. त्यानंतर आज उपोषणकर्त्यांसोबत गिरीश महाजन यांनी चर्चा केली. त्यांनी सरकारची भूमिका समजावून सांगितली. आंदोलकांचे समाधान झाल्याने अखेर उपोषण मागे घेण्यात आले.
उपोषणकर्त्यांना काय मिळाले?
21 सप्टेंबर रोजी धनगर आरक्षणसंदर्भात सरकार आणि यशवंत सेनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाली. त्यावेळी सरकारकडून सकारात्मक चर्चा झाली. सरकार गंभीर असल्याचे सांगण्यात आले होते. काही तांत्रिक आणि न्याय प्रविष्ट बाबी सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले होते.
आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी
गिरीश महाजन यांनी सांगितले की, आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात दाखल झालेले आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. ती मान्य करण्यात आली असून गुन्हे मागे घेण्यात येणार आहे.
आरक्षणाबाबतची तांत्रिक बाबी
धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात येईल. 50 दिवसांत आरक्षणाबाबतची तांत्रिक बाबी पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये माहिती जमवण्यासह कायदेशीर मार्गाबाबत चर्चा होणार आहे.
योजनांची प्रभावी अंमलबजावणी
धनगर समाजासाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी होती. तीदेखील पूर्ण करण्यात येणार असून योजना लागू करण्यात येणार आहे.
कोणत्या आधारावर उपोषण मागे घ्यावे?
आरक्षणाबाबत कोणतेही ठोस आश्वासन नाही
धनगर आरक्षणाबाबत कोणतेही ठोस आश्वासन नाही, अगोदर ठोस आश्वासन द्यावे. नाहीतर आम्ही कोणत्या आधारावर उपोषण सोडायचे. त्यामुळे आमचे उपोषण चालूच राहिल. राज्यात चक्काजामचा निर्णय घेतला जाईल, असे आंदोलक बाळासाहेब दोडतले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हटले.






