
मंचावर टाळ्या नेत्यांसाठी... पण पावसात भिजले ते खरे शिलेदार! जनतेसाठी झटले कार्यकर्ते, धाराशिव मोर्च्यातील खऱ्या नायकांची चर्चा
धाराशिव : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात मंगळवारी (२८ जुलै) धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या विराट मोर्च्याने राज्याचे लक्ष वेधून घेतले. मंचावर राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक नेत्यांची भाषणे झाली. घोषणांनी आसमंत दणाणून गेला. माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी नेत्यांना टिपले, त्यांच्या भाषणांच्या बातम्या झळकल्या… पण या जनसागरामागे स्वतःचा घाम, वेळ आणि आयुष्य खर्च करणारे काही चेहरे कायम पडद्याआडच राहिले. खरं तर, या ऐतिहासिक मोर्च्याचे तेच खरे शिलेदार होते.
मोर्च्याची घोषणा झाली आणि या कार्यकर्त्यांच्या आयुष्याचा दिनक्रमच बदलला. घर, व्यवसाय, कुटुंब, वैयक्तिक कामे बाजूला ठेवून त्यांनी एकच ध्यास घेतला, मोर्चा यशस्वी करायचाच! गावोगाव, वाडी-वस्त्यांवर, गल्लीबोळांत फिरत त्यांनी समाजाला एकत्र आणले. प्रत्येक दार ठोठावले, प्रत्येकाला उपवर्गीकरणाचा मुद्दा समजावून सांगितला. पोस्टर लावले, बॅनर उभारले, बैठका घेतल्या, फोन केले, निमंत्रणे दिली… प्रसिद्धीची अपेक्षा नव्हती; समाज जागा करण्याची तळमळ होती.
या संपूर्ण लढ्याच्या नियोजनात आरपीआय (आठवले)चे जिल्हाध्यक्ष विद्यानंद बनसोडे, आरपीआय (खरात)चे राजाभाऊ राऊत आणि रिपब्लिकन सेनेचे अनिल हजारे यांनी आघाडीची भूमिका बजावली. मोर्चा मार्गावरील ध्वजांपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भव्य व्यासपीठापर्यंत प्रत्येक गोष्टीत त्यांचा थेट सहभाग होता. विशेषतः विद्यानंद बनसोडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रभर जागून व्यासपीठ उभारणी, ध्वज, बॅनर्स आणि संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली. पहाट उजाडेपर्यंत त्यांची धावपळ सुरूच होती.
दुसऱ्या दिवशी आभाळ अक्षरशः कोसळत होते. पण या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ संपूर्ण धाराशिवने पाहिले. मुसळधार पावसालाही न जुमानता पाच ते सहा किलोमीटरपर्यंत मोर्चा पुढे सरकत राहिला. हजारो महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि समाजबांधव पावसात चिंब भिजले; पण एकाही पावलाने माघार घेतली नाही. घोषणांचा आवाज आणि कोसळणारा पाऊस यांची जणू स्पर्धाच सुरू होती.
या विराट आंदोलनामागे ग्रामीण भागातील असंख्य कार्यकर्त्यांचीही तेवढीच मोठी ताकद उभी होती. बाळासाहेब माने, भालचंद्र कठारे, सुनील वाघमारे, रणजित गायकवाड, पुष्पकांत माळाळे, कुंदन वाघमारे, सिद्धार्थ ओहाळ, विकास बनसोडे, शांतीनाथ शेरखान, ॲड. अरुणा गवई, सोमनाथ गायकवाड, संग्राम बनसोडे, मोहन बनसोडे, प्रवीण बनसोडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी गावागावांत जनजागृती करून हजारो समाजबांधवांना धाराशिवच्या मोर्चात सहभागी करून घेतले. त्यांच्या नावांचा मंचावर फारसा उल्लेख झाला नसेल; पण मोर्च्यात उमटलेल्या प्रत्येक पावलामागे त्यांच्या कष्टांचा ठसा स्पष्ट दिसत होता.
मोर्चा संपला… व्यासपीठ आवरले गेले… नेते पुढच्या दौऱ्यावर निघून गेले… कॅमेरेही बंद झाले. मात्र पावसात चिंब भिजलेले ते कार्यकर्ते अजूनही व्यवस्था आवरत होते. त्यांच्या अंगावरील ओले कपडे, चेहऱ्यावरचा थकवा आणि डोळ्यांतील समाधान हेच या आंदोलनाचे खरे यश होते.
कारण इतिहास नेत्यांची भाषणे नोंदवतो; पण चळवळींचा पाया रचणारे हात हे कार्यकर्त्यांचेच असतात. धाराशिवच्या या एल्गाराने पुन्हा एकदा सिद्ध केले—कोणतीही चळवळ व्यासपीठावरील भाषणांनी नव्हे, तर रस्त्यावर घाम गाळणाऱ्या, प्रसिद्धीपासून दूर राहून समाजासाठी झटणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या खांद्यावर उभी राहते. आणि म्हणूनच, या आंदोलनाचे खरे हिरो मंचावर नव्हते… ते पावसात भिजत जनसागर उभा करणाऱ्या त्या पडद्याआडच्या चेहऱ्यांमध्ये होते.
मोठ्या व्यासपीठावर भाषण करणारे नेते प्रत्येक आंदोलनात असतात. त्यांच्या भाषणांना टाळ्या मिळतात, त्यांची छायाचित्रे वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर झळकतात. पण त्या व्यासपीठामागे रात्रभर जागून खिळे ठोकणारा, पावसात भिजत बॅनर बांधणारा, गावोगावी फिरून समाजाला एकत्र आणणारा आणि शेवटच्या कार्यकर्त्याने घरी पोहोचेपर्यंत मैदान न सोडणारा कार्यकर्ता मात्र प्रकाशझोतात कधीच येत नाही धाराशिवच्या या विराट मोर्च्यानेही हेच अधोरेखित केले. मुसळधार पावसात हजारोंचा जनसागर उभा राहिला, त्यामागे कोणत्याही एका नेत्याचे नव्हे, तर शेकडो निःस्वार्थ कार्यकर्त्यांच्या घामाचे, त्यागाचे आणि संघटनशक्तीचे बळ होते.
नेत्यांची भाषणे इतिहासात नोंदली जातील; पण या आंदोलनाचा पाया रचणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पावलांचे ठसेही तितकेच अजरामर राहतील. कारण कोणतीही चळवळ व्यासपीठावरून नव्हे, तर रस्त्यावर घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर उभी राहते. म्हणूनच धाराशिवच्या या आंदोलनाचे खरे हिरो म्हणजे प्रसिद्धीपासून दूर राहून समाजासाठी अहोरात्र झटणारे हे निष्ठावान कार्यकर्तेच!