
पाणीटंचाईचे संकट गडद! धरणे-तलाव कोरडे; पाणीसाठ्याने गाठला तळ! २२६ पैकी केवळ ५ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक साठा
पावसाळ्याचा कालावधी सुरू असतानाही मागील दीड ते दोन महिन्यांपासून अपेक्षित पाऊस नसल्याने प्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा निर्माण झालेला नाही. परिणामी खरीप हंगामाबरोबरच आगामी काळातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाचे खंडित स्वरूप राहिल्याने पाणलोट क्षेत्रातून प्रकल्पांमध्ये पुरेसा पाण्याचा ओघ झालेला नाही.
धाराशिवच्या जलसाठ्याची चिंताजनक स्थिती; २२५ प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा अवघा ६.३६ टक्के
जिल्ह्यातील २२६ प्रकल्पांमध्ये १ मोठा, सुमारे १७ मध्यम आणि २०७ लघु प्रकल्पांचा समावेश आहे. लघु प्रकल्पांची संख्या सर्वाधिक तुळजापूर तालुक्यात ६६, त्यानंतर धाराशिव ४१ आणि उमरगा ३२ अशी आहे. भूममध्ये २०, कळंबमध्ये १६, वाशीमध्ये १४, लोहाऱ्यात १२, तर परंड्यात ६ लघु प्रकल्प आहेत.
मध्यम प्रकल्पांमध्ये धाराशिव, भूम व तुळजापूर प्रत्येकी ३, कळंब १, परंडा ४ आणि उमरगा ३ प्रकल्पांचा समावेश आहे. वाशी व लोहारा तालुक्यांत मध्यम प्रकल्पांची नोंद नाही.
अहवालातील वर्गीकरणानुसार जिल्ह्यातील बहुसंख्य प्रकल्प २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठ्याच्या श्रेणीत आहेत. काही ठिकाणी साठा पूर्णपणे शून्य असून ‘ड्राय’ अशी नोंद आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्यावर अवलंबून असलेल्या सिंचन क्षेत्रासमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
जलसंपदा विभागाच्या अहवालात काही प्रकल्पांच्या तांत्रिक स्थितीबाबतही विशेष नोंदी आहेत. एका स्वयंचलित गेट असलेल्या प्रकल्पात ९३ टक्के साठा असून गेट आपोआप उघडत असल्याने धरण १०० टक्के भरू शकत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
काही प्रकल्पांचे भराव खचल्याने दुरुस्तीची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी सांडवे फोडून ते बांधकामाधीन असल्याची नोंद आहे. तसेच काही प्रकल्प अद्याप बांधकामाधीन आहेत. पाणलोट क्षेत्र कमी असल्याने अपेक्षित पाणीसाठा न होणारे प्रकल्पही मोठ्या संख्येने आहेत.
जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्याने पुढील काळात होणारा पाऊस निर्णायक ठरणार आहे. पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यास साठ्यात वाढ होऊ शकते; मात्र पावसाचा खंड कायम राहिल्यास सिंचनाबरोबरच भविष्यातील पिण्याच्या पाण्याच्या नियोजनावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
जलसंपदा विभागाच्या १६ सप्टेंबरच्या अहवालातून जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांची सध्याची पाणीस्थिती स्पष्ट होत असून, उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन आणि वापर करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
एकूण पाटबंधारे प्रकल्प : २२६
मोठे प्रकल्प : १
मध्यम प्रकल्प : सुमारे १७
लघु प्रकल्प : २०७
५० टक्क्यांपेक्षा अधिक साठा : ५ प्रकल्प
५० टक्क्यांपेक्षा कमी साठा : २२० प्रकल्प
अनेक प्रकल्प : ० टक्के अथवा ‘ड्राय’