धाराशिव जिल्हा परिषद राज्यात अव्वल; प्रत्येक गावात डिजिटल सायन्स लॅब ते सौरऊर्जा; 'धाराशिव व्हिजन २०३०'ची राज्यभर चर्चा
जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या प्रांगणात आयोजित ‘आपला जीव धाराशिव व्हिजन २०३०’ कार्यक्रमात बोलताना मंत्री गोरे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली मांडण्यात आलेल्या विकास आराखड्याचे तोंडभरून कौतुक केले. विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेला पूरक ठरणारे हे व्हिजन असून, अशा प्रकारचे नियोजन करणारी धाराशिव जिल्हा परिषद राज्यातील पहिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर ! धाराशिवच्या 46046 शेतकऱ्यांना मोठा दिलासा
या व्हिजनमधील प्रत्येक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ग्रामविकास विभाग जिल्हा परिषदेच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही देतानाच, धाराशिवमधून सुरू झालेले हे अभियान राज्यभर पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या धाराशिवमधून विकासाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे सांगताना मंत्री गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्र आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेचा उल्लेख केला. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अतिरिक्त पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी योजनेला गती मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘व्हिजन २०३०’मधील ठळक संकल्प
प्रत्येक गावात डिजिटल सायन्स लॅब
आधुनिक वाचनालय आणि अभ्यासिका
प्रत्येक गावात विद्युत शवदाहिनी
प्रत्येक घरावर सौरऊर्जा प्रकल्प
शून्य वीजबिल गाव संकल्पना
आशा सेविका व पर्यवेक्षिकांना स्कूटर
हजारो महिलांना उद्योगासाठी आर्थिक मदत
सायंकाळी ७ ते ९ ‘टीव्ही-मोबाईल बंद’ ‘अभिमन्यू’ अभियान
प्लास्टिकमुक्त गावांसाठी ₹१,००० दंडाची तरतूद
११० गणांत उभारल्या जाणार विद्युत शवदाहिनी
जिल्ह्यातील ११० पंचायत समिती गणांमध्ये वित्त आयोगाच्या निधीतून विद्युत शवदाहिनी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धनाबरोबरच नागरिकांचा खर्च कमी करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी दिली.
१९९० मध्ये उभारलेली विद्यमान जिल्हा परिषद इमारत अपुरी पडत असल्याने नवीन प्रशासकीय इमारतीची मागणी सकारात्मकरीत्या पूर्ण केली जाईल. विद्यमान अध्यक्षा आणि उपाध्यक्ष यांच्या कार्यकाळातच धाराशिवच्या नव्या ‘मिनी मंत्रालया’चे स्वप्न साकार करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
“धाराशिव जिल्हा परिषद राज्यातील पहिली आहे, जिने ‘व्हिजन २०३०’सारखा दूरदृष्टीचा विकास आराखडा तयार केला. याचे अनुकरण संपूर्ण राज्याने करावे.”
— जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री
“प्रत्येक गावात विद्युत शवदाहिनी, प्रत्येक घरावर सौरऊर्जा आणि ‘७ ते ९ टीव्ही-मोबाईल बंद’ हा उपक्रम धाराशिवच्या सामाजिक परिवर्तनाचा पाया ठरेल.”
— अर्चना पाटील, अध्यक्षा, जिल्हा परिषद, धाराशिव.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळामुळे रेल्वे, पाणी, रोजगार आणि पर्यटन क्षेत्रातील मोठे प्रकल्प वेगाने मार्गी लागत आहेत.”
— राणाजगजितसिंह पाटील, आमदार, तुळजापूर.
‘व्हिजन २०३०’च्या माध्यमातून विकासाचे नवे मॉडेल सादर करणारी धाराशिव जिल्हा परिषद आता राज्यासाठी ‘रोल मॉडेल’ ठरणार असल्याचे संकेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या घोषणेमुळे स्पष्ट झाले असून, नव्या जिल्हा परिषद भवनाच्या आश्वासनाने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.






