
१५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात अवघा ६०.८ टक्के पाऊस
जिल्ह्याच्या १५ सप्टेंबरपर्यंतच्या पर्जन्यमान अहवालानुसार, जूनपासून आतापर्यंत जिल्ह्याची सामान्य पर्जन्यमानाची सरासरी ५१०.८ मिमी असून प्रत्यक्षात ३१०.७ मिमी पाऊस नोंदला आहे. म्हणजेच सरासरीच्या केवळ ६०.८ टक्के पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे १५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील अहवालात दिवसभरात सरासरी केवळ ६.८ मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यातील काही तालुक्यांची स्थिती तर अधिक चिंताजनक आहे. धाराशिव तालुक्यात जूनपासून आतापर्यंत ५४६.८ मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत ३११.१ मिमी म्हणजे ५६.९ टक्के पाऊस झाला आहे. तुळजापूरमध्ये ४९.६ टक्के, परंड्यात ६९.३ टक्के, भूममध्ये ७६.९ टक्के, कळंबमध्ये ७३.९ टक्के, उमरग्यात ५७.४ टक्के, लोहारा तालुक्यात ४४.२ टक्के आणि वाशी तालुक्यात ६६.५ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
पावसाने दगा दिला, धाराशिवच्या खरीपावर संकट! जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाने शेतकऱ्यांची चिंता वाढली
जिल्ह्यातील काही पर्जन्यमापक मंडळांमध्ये पावसाची स्थिती अत्यंत गंभीर आहे. धाराशिव तालुक्यातील करजखेड मंडळात जूनपासून आतापर्यंत केवळ १६.५ मिमी, येडशीमध्ये १२५.८ मिमी आणि बेंबळीत १५१.१ मिमी पाऊस झाला आहे. लोहारा तालुक्यातील धनोरी मंडळात केवळ ७ मिमी, तर वाशी तालुक्यातील पारा मंडळात ३ मिमी पाऊस नोंदला गेला आहे.
पावसाच्या या दीर्घ खंडाचा थेट परिणाम जमिनीतील ओलावा, पिकांची वाढ आणि भूजलपातळीवर होण्याची शक्यता आहे. पावसाअभावी विहिरी आणि विंधन विहिरींच्या पाणीपातळीत घट होऊ लागल्याने आगामी काळात शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची चिन्हे आहेत.
जलसाठ्यांवरही परिणाम
पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये अपेक्षित पाणीसाठा निर्माण झालेला नाही. त्यामुळे आगामी उन्हाळ्यापूर्वीच पाणी नियोजनाचे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. पावसाचा खंड आणखी वाढल्यास उपलब्ध जलसाठ्यांवर पिण्याच्या पाण्यासह शेती आणि इतर गरजांचा ताण वाढू शकतो.
यंदा पावसाने सुरुवातीला काही भागांत समाधानकारक हजेरी लावली असली तरी त्यानंतरच्या दीर्घ खंडामुळे एकूण हंगामी पर्जन्यमानाची स्थिती खालावली आहे. १५ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सामान्य पर्जन्यमानाच्या केवळ ६०.८ टक्के पाऊस झाल्याने पावसाळ्याच्या अखेरीस उर्वरित तूट भरून निघण्यासाठी दमदार पावसाची गरज निर्माण झाली आहे.
पावसाने पाठ फिरवल्याने आता केवळ पावसाची प्रतीक्षा करण्यापेक्षा संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाला आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे. उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन, संभाव्य टंचाईग्रस्त गावांचे सर्वेक्षण, पिण्याच्या पाण्याचे पर्यायी स्रोत आणि भूजलपातळीवर लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
हवामानाच्या अंदाजानुसार पावसाची शक्यता व्यक्त होत असली तरी प्रत्यक्ष पर्जन्यमानात मोठी तफावत दिसून येत आहे. त्यामुळे उर्वरित पावसाळ्यात जिल्ह्यात किती पाऊस पडतो, यावर आगामी पाणीस्थिती मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. सध्या मात्र अल्प पाऊस, घटती भूजलपातळी आणि अपुरा जलसाठा या तिहेरी संकटामुळे धाराशिव जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले आहे.