
धाराशिव जिल्हा येतोय हरित ऊर्जेच्या नकाशावर, १,४२० मेगावॅट वीज निर्मिती, आणखी ४८३ मेगावॅट प्रकल्प मार्गावर
शीतलकुमार शिंदे, धाराशिव : दुष्काळग्रस्त अशी ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्याने आता हरित ऊर्जेच्या क्षेत्रातही उल्लेखनीय झेप घेतली आहे. सूर्यप्रकाश आणि वाऱ्याच्या नैसर्गिक संपत्तीचा प्रभावी वापर करत जिल्ह्यात सौर, पवन आणि बगॅसवर आधारित वीज निर्मिती प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उभारले जात आहेत. सध्या जिल्ह्यात १,४२०.९९ मेगावॅट इतकी हरित ऊर्जा निर्मिती क्षमता कार्यान्वित असून, आणखी ४८३.७० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प विविध टप्प्यांवर प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे आगामी काळात धाराशिव हा मराठवाड्यातीलच नव्हे तर राज्यातील महत्त्वाच्या हरित ऊर्जा केंद्रांपैकी एक म्हणून उदयास येण्याची चिन्हे आहेत.
गुंतवणुकीच्या आमिषाने ११.४६ लाखांची सायबर फसवणूक; धाराशिव सायबर पोलिसांत गुन्हा
जिल्ह्यातील उपलब्ध आकडेवारीनुसार सौर ऊर्जेची स्थापित क्षमता ६३३.७९ मेगावॅट इतकी आहे. त्यामध्ये ओपन ॲक्सेस व महावितरण विक्रीसाठी ४१६.११ मेगावॅट, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना (एमएसकेव्हीवाय) अंतर्गत १८.६९ मेगावॅट, तर एमएसकेव्हीवाय २.० अंतर्गत १९९.०० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यरत आहेत. यामुळे जिल्ह्यातील ऊर्जा निर्मितीत सौर ऊर्जेचा मोठा वाटा निर्माण झाला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील डोंगराळ व मोकळ्या परिसराचा लाभ घेत पवन ऊर्जा प्रकल्पांचीही मोठ्या प्रमाणावर उभारणी करण्यात आली आहे. सध्या पवन ऊर्जेची एकूण क्षमता ६३२.२० मेगावॅट इतकी आहे. यामध्ये टीपी सौर्या प्रा. लि. (लोहारा) – १०२.६० मेगावॅट, जेएसडब्ल्यू रिन्यूएबल एनर्जी – ९९.०० मेगावॅट, टॉरेंट सोलारजेन (लोहारा) – ९७.२० मेगावॅट, रिन्यू वायू ऊर्जा – ७६.०० मेगावॅट, टॉरेंट सोलारजेन (तुळजापूर) – ७६.०० मेगावॅट, तसेच जेएसडब्ल्यू रिन्यूएबल एनर्जी थ्री – १२०.०० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यरत आहेत. उर्वरित प्रकल्पांसह जिल्ह्याची पवन ऊर्जा क्षमता ६३२.२० मेगावॅट झाली आहे.
उसाच्या बगॅसपासून वीज निर्मितीतही धाराशिव मागे नाही. जिल्ह्यातील साखर कारखान्यांमधून १५५.०० मेगावॅट वीज निर्मिती क्षमता उपलब्ध आहे. यामध्ये अयान मल्टिट्रेड एलएलपी – ३२ मेगावॅट, क्विनर्जी इंडस्ट्रीज – ३२ मेगावॅट, लोकमंगल माऊली साखर कारखाना – ३० मेगावॅट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना – १६ मेगावॅट, कांचेश्वर शुगर – १५ मेगावॅट, तसेच इतर साखर कारखान्यांच्या को-जनरेशन प्रकल्पांचा समावेश आहे.
धाराशिवच्या ऊर्जा क्षमतेत लवकरच मोठी वाढ होणार आहे. ४८३.७० मेगावॅट क्षमतेचे सौर व पवन ऊर्जा प्रकल्प सध्या ईएचव्ही (अतिउच्च दाब) वीजजाळ्याशी जोडणीच्या प्रक्रियेत आहेत. यामध्ये जेएसडब्ल्यू रिन्यूएबल एनर्जी थ्री – २००.७० मेगावॅट, टाटा पॉवर एनर्जी – १०१.०० मेगावॅट, ज्युनिपर ग्रीन ईटीए फाईव्ह – ७५.०० मेगावॅट (सौर) व २६.०० मेगावॅट (पवन), जेएसडब्ल्यू रिन्यूएबल एनर्जी कोटेड टू – ४०.०० मेगावॅट, जेएसडब्ल्यू रिन्यूएबल एनर्जी सिमेंट – १५.०० मेगावॅट, तसेच ज्युनिपर ग्रीन पॉवर फाईव्ह – २६.०० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्याची एकूण हरित ऊर्जा क्षमता १,९०० मेगावॅटच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे.
तुळजापूर, लोहारा, उमरगा, भूम, कळंब, परंडा आणि धाराशिव तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सौर व पवन ऊर्जा प्रकल्प उभारले गेल्याने हा परिसर आता हरित ऊर्जा पट्टा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या प्रकल्पांमुळे राज्याच्या वीज निर्मितीत भर पडत असून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती, पायाभूत सुविधांचा विकास आणि गुंतवणुकीलाही चालना मिळत आहे. ऊर्जा क्षेत्रातील ही वाढ लक्षात घेता, पारंपरिक दुष्काळी जिल्ह्याची ओळख बदलत धाराशिव आता स्वच्छ, शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीचे नवे केंद्र म्हणून वेगाने पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे.