धुळे : वन्य प्राण्यांकडून (Wild Animals) होणारे शेतीचे नुकसान आणि पाळीव प्राण्यांची शिकार याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. धुळे तालुक्यातील नंदाळे बुद्रुकमध्ये (Nandale Budruk) देखील वन्य प्राण्यांच्या नुकसानीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. परिसरामध्ये हरिण, रानडुक्करे, काळवीट या वन्य प्राण्यांकडून शेतीतील पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. वनविभागाने (Dhule Forest Department) या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नंदाळे बुद्रुक येथील शेतकरी करत आहेत.
या वन्य प्राण्यांनी शिवारात चांगलाच धुमाकूळ घातल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. हे वन्य प्राणी शेतातील छोट्या पिकांचे शेंडे खात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान वन्यप्राणी करत आहेत. धुळे जिल्हा वन विभागाने तात्काळ शेतकर्यांच्या या वन्य प्राण्यांपासून होणारा त्रास कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अन्यथा शेतकरी राजा हा आता तोंडाशी आलेल्या घासापासून वंचित राहील. त्यामुळे लवकरात लवकर या वन्य प्राण्यांना आळा घालण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा. अशी मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.
यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडेल आणि शेतीतून चांगले उत्पन्न मिळेल अशी शेतकर्यांना अपेक्षा होती, मात्र यावर्षी देखील पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकरी पिके वाचविण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. शेतीसाठी पाण्याची भीषण टंचाई जाणवत असताना गुराढोरांसाठी चारा वाचवण्याचे कष्ट शेतकरी घेत आहेत. त्यातच भर म्हणजे वन्य प्राण्यांकडून मोठं नुकसान केलं जात आहे. या सर्व परिस्थितीचा सामना करत असताना निसर्गाची अवकृपा व वन्य प्राण्यांपासून होणारे शेतीमालाचे नुकसान यामुळे शेतकरी हैराण झाला आहे.