सुट्यांमध्ये फिरण्यासाठी पर्यटक कोकणात फिरायला येतात. अशातच आता दिवेआगार येथे आलेल्या पुण्यातील पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून मित्रांसोबत पर्यटनासाठी हा तरुण श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे आला होता. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी सर्व मित्र समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, भरतीच्या वेळी समुद्राच्या पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने हा तरुण पाण्यात वाहून गेला. सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिक आणि जीवरक्षकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला पाण्याबाहेर काढून तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवरकोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र, अनेकदा प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे किंवा पाण्याचा अंदाज न येणे अशा कारणांमुळे अशा दुर्घटना घडत आहेत. दिवेआगर सारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या किनाऱ्यावर ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.समुद्रात उतरताना लाटांचा वेग आणि भरती-ओहोटीच्या वेळा लक्षात घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने लावलेल्या सूचना फलकांचे पालन करून पर्यटकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






