
फोटो सौजन्य - Social Media
वाशिम : खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात खतांच्या अनियमिततेचे गंभीर प्रकार उघडकीस येत आहेत. ‘डीएपी’ खताच्या विक्रीत मोठा घोळ समोर आला असून, शासनाच्या ई-पॉस प्रणालीला बगल देत तब्बल २४० बॅगची बेकायदेशीर विक्री केल्याचा प्रकार मंगळवारी उघड झाला. या प्रकरणी २७ शेतकऱ्यांच्या नावावर व्यवहार दाखवण्यात आले असून, प्रत्यक्षात नियमबाह्य पद्धतीने खत विक्री केल्याचे स्पष्ट झाले आहे.
कृषी विभागाच्या पथकाने वाशिम येथील ‘मोरया कृषी सेवा केंद्रा’ची तपासणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. विक्रेत्याकडून खतविक्री करताना शासनाच्या ‘आयएफएमएस’ आणि ‘ई-पॉस’ प्रणालीचा वापर करण्यात आलेला नव्हता. त्याऐवजी ऑफलाइन पद्धतीने व्यवहार करून नोंदी लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुकानातील स्टॉक रजिस्टर, विक्री पुस्तके आणि प्रत्यक्ष साठा यामध्ये मोठी तफावत आढळून आली.
तपासादरम्यान २७ शेतकऱ्यांच्या नावाने व्यवहार दाखवण्यात आले, मात्र त्यांना पक्की देयके देण्यात आलेली नव्हती. खत नियंत्रण आदेशातील नियमांचे उल्लंघन करत काही खतांची विक्री कोणत्याही अधिकृत नोंदीशिवाय केल्याचेही उघड झाले. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी कृषी गुणनियंत्रण अधिकारी शिवाजीराव जाधव यांनी वाशिम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार मोरया कृषी सेवा केंद्राचे मालक ज्ञानेश्वर रामकृष्ण देवळे यांच्यासह बारामती येथील खत पुरवठादार कंपनीचे मनोज कोरतकर, अमोल राठोड आणि पूजा राठोड अशा पाच जणांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषी विभागाने केलेल्या या कारवाईमुळे जिल्हाभरातील खतविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा सुरळीत राहणे अत्यावश्यक असताना अशा प्रकारांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान, या घटनेनंतर जिल्ह्यातील इतर कृषी सेवा केंद्रांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना अधिकृत पावती घेणे आणि व्यवहाराची खात्री करणे आवश्यक असल्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.