इचलकरंजी: कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायीनी असणारी पंचगंगा नदी प्रदुषणमुक्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी, प्रदुषणमुक्तीसाठी आवश्यक निधीची तरतूद आणि प्रदुषणास जबाबदार असणार्यांवर कारवाई अशा विविध विषयांवर मंगळवारी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. पंचगंगा प्रदुषणमुक्तीसाठी लवकरात लवकर ठोस पावले उचलण्याचा निर्णयही यावेळी झाला.
पंचगंगा नदी प्रदुषणमुक्तीसाठी निधीची तरतूद करणे, पंचगंगा प्रदुषणाच्या निर्मुलनासाठी उपाययोजना करणे, पंचगंगा प्रदुषणमुक्त होऊन स्वच्छ होणेसाठी ठोस निर्णय घेणे आदी संदर्भात मंगळवारी दुपारी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या दालनात बैठक पार पडली. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदार आवाडे यांनी पंचगंगा प्रदुषणाचा मुद्दा उपस्थित करत या संदर्भात तातडीने बैठक घेऊन ठोस उपाययोजना आणि तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने ही बैठक झाली.
यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी पंचगंगा नदी प्रदुषणाचा प्रश्न सातत्याने गंभीर बनत चालला आहे. वस्त्रनगरीसह नदीकाठावरील गावांना या प्रदुषणाचा फटका बसत आहे. पाणी पिण्यायोग्य असतानाही केवळ प्रदुषणामुळे त्याचा वापर करता येत नाही. हे सर्व रोखण्यासाठी पंचगंगा नदी तातडीने प्रदुषणमुक्त होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांची ठोसपणे अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
या संदर्भात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थितांचे म्हणणे ऐकून घेत संबंधित विभागाच्या अधिकार्यांकडून माहिती जाणून घेत पंचगंगा प्रदुषणमुक्तीसाठी लवकरात लवकर आवश्यक त्या उपाययोजना करण्यासह आवश्यक त्या निधीची उपलब्धता करुन देण्याबाबत सकारत्मकता दर्शवत लवकरात लवकर प्रदुषणमुक्तीसाठी ठोस उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.