शेतकऱ्यांची आमदार डॉ. अतुल भोसले (फोटो- टीम नवराष्ट्र)
कराड: सध्या सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने सुरू झाले आहेत. मात्र, कोणत्याही कारखान्याने उस दर जाहीर केलेला नाही. त्यामुळे आपण यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस दराची कोंडी फोडावी. तसेच चालू हंगामात गळीतास येणाऱ्या उसाला एकरकमी चार हजार रुपये दर जाहीर करावा, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेने आमदार डॉ. अतुल भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
साखर निर्यातबंदी उठवावी. साखरेचे भाव प्रतिकिलो चाळीस रुपये करावा. इथेनॉलसाठी उसाचा रस वापरण्यास परवानगी द्यावी, उसाचा एफआरपी बेस 8.30 टक्के पूर्वीप्रमाणे करण्यात यावा. यासाठी आपण केंद्र सरकारला विनंती करावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विश्वास जाधव, युवा अध्यक्ष गणेश शेवाळे, तालुकाध्यक्ष आनंदराव थोरात, पोपटराव जाधव, सुनील कोळी, उत्तम खबाले, बाबासो मोहिते, सागर कांबळे, शंभू पाटील उपस्थित होते.
लोकांना केंद्र सरकारचे सहा हजार, लाडक्या बहिणींचे दीड हजार, अर्ध्या तिकिटात एसटी, मोफत रेशन मिळत असल्याने यातच जनता गडबडून गेली आहे. शेतकरी हक्काचे, कष्टाचे, घामाचे दाम मागायचे विसरला आहे. शेतकऱ्याच्या ऊस, सोयाबीन, कापूस, कांदा, दुधाला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे यासाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरावे. लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी बळीराजा शेतकरी संघटना कायम राहील, असे आवाहन या निवेदनाद्वारे बळीराजा शेतकरी संघटनेतर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
कारखानदार, शेतकरी अडचणीत
गेल्या दहा वर्षात ऊस दरासाठी कोणत्याही प्रकारचे तीव्र आंदोलन झाले नसल्याने ऊसाला वाढीव दर मिळालेल्या नाही. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घरात न बसता आपल्या कामाचे दाम मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरून लढा द्यावा. सध्या साखर कारखानदार आणि शेतकरी दोघेही अडचणीत सापडले असून याला केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे, असे निवेदनात म्हटले अाहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला स्वीकारले, याचा मला जास्ती आनंद झाला आहे. माझ्यावरील जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणार असून जनतेने मला दिलेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न राहील. कराड दक्षिण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी जे लागेल ते आपण करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला ग्वाही दिली आहे. या मतदारसंघातील जनतेच्या सर्व मागण्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे,” असा विश्वास अतुल भोसले यांनी व्यक्त केला आहे.