
भंडारा जिल्ह्यात सोन्याच्या खाणी! किटाळी परिसरात सर्वेक्षणाला मिळणार गती; रोजगाराच्या संधीची शक्यता
भंडारा जिल्ह्यात किटाळी परिसरात सोन्याची खाण व इतर मौल्यवान धातूंच्या प्रकल्पाबाबत मोठी आणि उत्कंठावर्धक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील भूगर्भात सोने, चांदी आणि तांबे यांसारखे मौल्यवान धातू असण्याची शक्यता भूगर्भशास्त्रज्ञांच्या विस्तृत संशोधनानंतर वर्तवली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या आढावा बैठकीत या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली असून, पावसाळ्यानंतर या सर्वेक्षणाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. १८० हेक्टर क्षेत्रात होणार खोदकाम जिल्ह्यात लाखनी तालुक्यातील किटाळी व परिसरातील एकूण १८० हेक्टर जागेत हे सर्वेक्षण होणार आहे. हे धातू, शोधण्यासाठी हैदराबाद येथील ओरा इन्फ्रा कंपनीला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले आहे. किटाळी परिसर बहुतांश जंगलव्याप्त असून, ही कंपनी संपूर्ण सर्वेक्षणाचे काम स्वतःच्या खचनि भूगर्भात अत्याधुनिक ड्रिलिंग मशीनच्या साहाय्याने करणार आहे.(फोटो सौजन्य – AI)
ज्या १८० हेक्टर जमिनीचे सर्वेक्षण होणार आहे, ती जमीन वनविभाग, शासकीय आणि खासगी मालकीची आहे. या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. किटाळी परिसरात वनविभागाचे दाट जंगल असून खाणीमुळे ते प्रभावीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भूगर्भात सोने, चांदी, तांबे किंवा इतर मौल्यवान धातू आहेत का, हे निश्चित करण्यासाठी जमिनीचे सखोल मूल्यांकन केले जाईल. त्या धातूंचे प्रमाण, ते काढण्याचा खर्च आणि ते आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल की नाही, या सर्व बाबींवर विचार केला जाणार आहे. नागपूर येथील खनिकर्म संचालनालयाकडून या कंपनीच्या कामावर विशेष देखरेख ठेवली जाणार आहे.
दरम्यान, भंडारा जिल्ह्यात आधीपासूनच मँगनीज मोठ्या प्रमाणात आढळते. यासोबतच लोहखनिज, क्रोमाइट, सिलिम्युनम, कोरंडम, फिरोफायलीट, कायनाइट आणि क्वार्ट्स ही खनिजेही जिल्ह्यात उपलब्ध आहेत. जिल्ह्यात मंगनीज वीस दशलक्ष टन उपलब्ध असून, डोंगरी बुद्रुक, बाळापूर, सीतासावंगी, इंदूची येथील खार्णीमध्ये मँगनीजचे साठे आढळतात.
दुष्काळी यवतमाळात आढळला समृद्ध वारसा! दिग्रसनजीक उत्खननातून मिळाली ३ हजार वर्षापूवींची मानवी वस्ती
किटाळी गाव परिसरातील १८० हेक्टर क्षेत्रात विविध धातूंच्या उपलब्धतेचे मूल्यांकन करण्यासाठी हैदराबादस्थित कंपनीला करार देण्यात आला आहे. ही कंपनी सर्वेक्षण करून राज्य सरकारला अहवाल सादर करेल. किटाळी परिसरात सोने, चांदी आणि तांबे यांसारख्या धातूंच्या खाणी आढळल्यास जिल्ह्यात अनेक सकारात्मक बदल होऊन तरुणांसाठी रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होतील अशी शक्यता आहे, अशी माहिती सचिन वाढिवे यांनी दिली आहे.