
फोटो सौजन्य - Social Media
गत दोन दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे आणि हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी सायंकाळी घाटाखालच्या Malkapur, Nandura, Shegaon आणि Jalgaon Jamod तालुक्यांत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गहू, हरभरा आणि कांदा पिकांना फटका बसला. त्यानंतर गुरुवारी Chikhli तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीस आलेले गहू, हरभरा, मका यांसारखी पिके तसेच आंबा व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गारांच्या माऱ्यामुळे उभे पीक आडवे झाले असून काही ठिकाणी काढणी करून ठेवलेला हरभरा पावसात भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान अधिकच वाढले आहे. अचानक आलेल्या वादळामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली होती.
यापूर्वीच खरीप हंगामात ढगफुटीसदृश्य पावसामुळे सोयाबीन, उडीद, मुग आणि कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यात उरलेल्या पिकांचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. लागवड खर्च देखील निघणे कठीण झाले असताना आता रब्बी हंगामातील पिकांनाही अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
गुरुवारी दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन काळे ढग दाटून आले आणि काही वेळातच वादळी वाऱ्यासह गारपीट सुरू झाली. सुमारे १५ ते २० मिनिटे झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची तीव्रता वाढल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली.
दरम्यान, Malkapur तालुक्यात बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे बीजवाईच्या कांद्याचे पीक आडवे झाले. नरवेल येथील शेतकरी विलास कोथळकर यांच्या शेतातील कांद्याचे पीक जमिनीवर कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच इतर भागांतही गहू आणि कांदा पिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
एकूणच, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे चिखलीसह परिसरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.