फोटो सौजन्य - Social Media
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० हा शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा असून, सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयातून काम करत प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी Yogesh Kumbhekar यांनी केले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.० अंतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा त्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडली. या बैठकीत प्रकल्पाच्या विविध घटकांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
सभेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके, कृषी उपसंचालक हिना शेख, कृषी विकास अधिकारी अभिजित देवगीरकर, मुख्यमंत्री फेलो संकेत नरुटे तसेच नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक शंकर कोकडवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना विविध विभागांमधील समन्वय वाढविण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
जिल्ह्यात कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.० अंतर्गत एकूण १८९ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व गावांचे आराखडे बैठकीत मंजूर करण्यात आले असून, मृद व जलसंधारणासाठी सुमारे ६८ हजार हेक्टर क्षेत्रावर ८९० कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या कामांमुळे शेतीची उत्पादकता वाढविणे, पाणी साठवण क्षमता वाढविणे तसेच शाश्वत शेतीला चालना देणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्पासंदर्भातील सादरीकरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाहा यांनी केले.
बैठकीदरम्यान कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती मांडली. तसेच, उपस्थितांनी प्रकल्प अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध सूचना मांडल्या व शंकांचे निरसन करण्यात आले. तालुका कृषी अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की, प्रकल्पातील प्रत्येक घटकाचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करून ठरलेल्या वेळेत उद्दिष्टे पूर्ण करावीत. तसेच, प्रकल्पाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राखणे आणि गुणवत्तेची खात्री करणे ही सर्व संबंधितांची जबाबदारी आहे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी पर्यावरण व शेतीसंबंधित विविध बाबींवर विशेष भर देण्यात आला. जलसंधारण, मृदसंवर्धन, पीक विविधीकरण तसेच हवामान बदलाला अनुकूल शेती पद्धती या विषयांवर सखोल चर्चा झाली. प्रकल्पाच्या विविध उपक्रमांची सद्यस्थिती, उद्दिष्टपूर्ती आणि अंमलबजावणीतील अडचणींचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. एकूणच, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० हा जिल्ह्यातील शेती विकासासाठी महत्त्वाचा ठरणार असून, सर्व यंत्रणांनी समन्वयातून काम केल्यास शेतकऱ्यांच्या जीवनमानात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणता येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.






