शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून ढपला पाडायचा उद्योग सुरु; राजू शेट्टींचा निशाणा
गडहिंग्लज : शक्तिपीठ महामार्गातील पत्रादेवी ही गावच्या वेशीवरची देवी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बांदा येथील पत्रादेवी हे शक्तीपीठ असल्याचे सांगून राज्यातील भाविकांची व जनतेची फसवणूक करून अदानीच्या फायद्यासाठी व ५० हजार कोटींचा ढपला पाडायचा असल्याने शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सुबुद्धी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला देण्याचे साकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी बांदा येथील पत्रादेवीस घातले.
स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी ११ जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गबाधित जिल्ह्याचा दौरा झाल्यानंतर शक्तिपीठ महामार्गाचे शेवटचे मंदिर असलेल्या पत्रादेवी मंदिरास भेट देऊन सावंतवाडी येथील बाधित गावातील ग्रामस्थ, शेतकरी तसेच पर्यावरणप्रेमींची भेट घेतली. पत्रादेवी मंदिर हे एका गावाच्या वेशीवरची देवी आहे. याठिकाणी कोणतेही मोठे मंदिर अथवा शक्तिपीठ नाही. पवनार ते पत्रादेवी शक्तिपीठ महामार्ग करून पवनार येथील माहूरगड, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूरची करवीर निवासनी आई अंबाबाई, जोतिबा ही शक्तिपीठे सध्या अस्तिवात असलेल्या रत्नागिरी-नागपूर महामार्गाने जोडलेली आहेत.
सध्या कोकणात येण्यासाठी कोल्हापूर येथून ७ महामार्ग आहेत. कोकणातील अनेक प्रकल्प निधीअभावी अपुरे आहेत. १७ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्ग रखडला आहे. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग १५ वर्षांपासून निधीअभावी रखडला आहे. मग कोकणामध्ये येणारा नवीन शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास कशासाठी? खरंच जर देवेंद्र फडणवीस यांना कोकणचा विकास करायचा असल्यास गोष्टींना प्राधान्य द्यावे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शक्तिपीठ महामार्ग हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जनतेवर लादला जात आहे. रोजगार हमी योजना , कंत्राटी कामगार , पिकविमा योजना , फळबाग लागवड अनुदान, भात पिकाचे प्रोत्साहन अनुदान, बांधकाम व रस्ते विभागाची प्रलंबित ९० हजार कोटीची बिले यासारख्या गोष्टीत राज्य सरकार आर्थिक आरिष्टात सापडले आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती नसताना ८६ हजार कोटीचा शक्तीपीठ महामार्ग कशासाठी करत आहेत.
शक्तिपीठ महामार्गाला केला जातोय मोठा विरोध
दुसरीकडे, शक्तिपीठ महामार्गाला मोठा विरोध केला जात आहे. जमिनी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या…देत नाही देत नाही जीव गेला तरी देणार नाही, अशी आरोळी करत महायुती सरकारच्या विरोधात बोंब मारत नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग रद्द व्हावा या मागणीसाठी कोल्हापुर येथील पंचगंगा नदी पुलावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केले होते.