कल्याण : काही दिवसांपूर्वी पडघ्यामध्ये झालेल्या टी. राजा यांच्या सभेवरुन वाद सुरु झाला होता. त्या वादाचे भिवंडी लोकसभेतील (Bhiwandi Loksabha) आजी – माजी खासदारांमधील वाक्युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. या दोन्ही नेत्यांमधील वाद आता बुद्धीमत्तेवर येऊन ठेपला आहे. कपिल पाटील (Kapil Patil) यांच्या बुद्धीमत्तेची कीव येत असून त्यांनी आपली बुद्धिमत्ता तपासून पहावी अशी बोचरी टिका नवनिर्वाचित खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे (MP Suresh Mhatre) यांनी केली आहे.
खासदार सुरेश म्हात्रे यांनी आज कल्याणमध्ये माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी कपिल पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. आपण पडघ्यात झालेल्या सभेला विरोध केला नव्हता तर अनेक गुन्हे दाखल असलेल्या टी. राजा यांच्याबाबत आक्षेप होता. कपिल पाटील हे खोटे बोलत असून आपल्याकडे एक बॅनर आहे. ज्यामध्ये कपिल पाटील फाऊंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचा दावा खासदार सुरेश म्हात्रे यांनी त्यांच्या मोबाईलमधील बॅनर दाखवत केला.
पुढे त्यांनी माध्यमांना सांगितले की, कपिल पाटील यांच्याच पक्षाच्या दोन खासदारांनी जाहीररीत्या सांगितले होते की, आम्हाला संविधान बदलण्यासाठी 400 पारचा नारा दिला होता. पडघ्यातील सभेतही टी. राजा यांनी भारताला हिंदूराष्ट्र बनविण्यासाठी 400 पार जागा पाहिजे होत्या असे सांगितले असल्याचा दावा सुरेश म्हात्रे यांनी केला. कपिल पाटील यांनी मला एक नोटीस पाठवली तर आपल्याकडे बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, क्रशर, हायवेवरील गाळे असे त्यांचे दहा मॅटर आहेत. त्यांची एक नोटीस आली तर त्यांच्या दहा शासकीय चौकशीचे आदेश निघतील असा इशारा देत आपण त्यांच्या कायदेशीर कारवाईची वाट पाहत असल्याचे सांगत खासदार सुरेश म्हात्रे यांनी त्यांना आव्हान दिले.