राहुल आवाडे की मदन कारंडे? इचलकरंजीत कोण मारणार बाजी? तांत्रिक बिघाड वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण
इचलकरंजी: इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात बुधवारी मध्यंतरीचा काळ वगळता अत्यंत चुरशीने मतदान झाले. किरकोळ शाब्दिक वाद, तांत्रिक बिघाड वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. दुपारी ४ नंतर काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगाच्या रांगा लागल्याने रात्री उशीरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहिली. मतदारसंघात सरासरी ६५ ते ६७ टक्के मतदान झाल्याचे समजते.
महायुतीच्या वतीने राहुल आवाडे, महाविकास आघाडीच्या वतीने मदन कारंडे आणि अपक्ष विठ्ठल चोपडे यांच्यासह एकूण १३ उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यापैकी राहुल आवाडे आणि मदन कारंडे यांच्यातच अत्यंत मुख्य लढत आहे. अपक्ष विठ्ठल चोपडे हे किती मते घेणार हे महत्वाचे ठरणार आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात इचलकरंजी शहरासह कबनूर, कोरोची, तारदाळ, खोतवाडी व चंदूर या गावांचा समावेश आहे. एकूण ३ लाख १२ हजार ६६४ मतदारांची नोंद झाली होती. एकूण २६६ मतदान केंद्रांपैकी २४३ केंद्रे ही वेबकास्टिंग मतदान केंद्रे होती. तर मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध १४ मतदान केंद्रांवर वेगवेगळ्या संकल्पना (थीम) राबविण्यात आल्या होत्या.
सकाळी ७ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरु करण्यात आली. सकाळच्या पहिल्याच सत्रात अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या दोन तासातच तब्बल २३ हजार ३४२ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. दोन तासाच्या कालावधीत ही आकडेवारी ६१ हजार ८१२ म्हणजे १९.७७ टक्के होती. पहिल्या दोन्ही सत्रात महिलांची टक्केवारी लक्षणीय होती. दुपारी १ वाजेपर्यंत त्यामध्ये ४१ हजार मतदारांची भर पडून आकडेवारी १ लाख २ हजार ५२८ इतकी झाली. तीन वाजल्यानंतर शहरातील अनेक केंद्रांवर उपस्थित राजकीय कार्यकर्त्यांना मतदार आणण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत होती. सर्वांचे रुसवे, फुगवे काढत आणि मागणी पूर्ण केल्यानंतरच मतदार वाहनातून गटागटाने मतदान केंद्रावर येताना दिसत होते. शहरातील दाट लोकवस्तचा परिसर असलेल्या बहुतांशी केंद्रांवर दुपारी ४ वाजेपर्यंत मतदारच नसल्याचे चित्र होते. मात्र चारनंतर हीच मतदान केंद्रे नागरिकांच्या रांगा लागल्याने गर्दीने फुलून गेली होती. त्यामुळे प्रशासनाची तारांबळा उडाली. तर पोलिसांनाही कसरत करावी लागली.
महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांनी चंदूर येथे, आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांनी डीकेटीई नारायण मळा, अपक्ष उमेदवार चोपडे यांनी कै. सुभेदारकाका विद्या मंदिर, आमदार प्रकाश आवाडे यांनी नुतन मराठी विद्यालय आणि भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी सरस्वती हायस्कुल येथील केद्रांवर मतदान केले.
काही ठिकाणच्या केंद्रांवर एकमेकांच्या समोरा समोर आल्यानंतर उमेदवार समर्थकांमध्ये जोरदार घोषणाबाजी केली जात होती. मतदारांच्या सोयीसाठी सर्वच उमेदवारांनी मतदान केंद्र परिसरात बुथ उभारणी करुन आधुनिक यंत्रणेच्य माध्यमातून सहकार्य केले जात होते.
विधानसभा मतदारसंघातील लढतीची परिस्थिती लक्षात घेता तांबेमाळ, जवाहरनगर, शहापूर, विक्रमनगर, कोल्हापूर नाका परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. तर अप्पर पोलिस अधिक्षक निकेश खाटमोडे-पाटील, पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे यांच्यासह तिन्ही पोलिस ठाण्याचे प्रभारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. परराज्यातूनही मागविण्यात आलेल्या फौजफाट्यानेही आपले कर्तव्य चोखपणे बजावले. सायंकाळी सहानंतर सर्वच मतदान केंद्रावरील मशिन्स नेण्यासाठी वाहने तैनात होती. तर प्रक्रिया पूर्ण होईल त्यानुसार मतदान यंत्रणे उमेदवार प्रतिनिधींसमोर सील करुन मध्यवर्ती केंद्र करण्यात आलेल्या राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे रवाना केली जात होती. त्याठिकाणी प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौ. मौसमी चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रे स्विकारुन ती स्ट्राँगरुममध्ये ठेवली जात होती.