
राज्यातील 'लाडक्या बहिणीं'साठी दिलासादायक माहिती; सरकारने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय, होणार चांगला फायदा...
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्यातील महिलांसाठी चांगलीच फायद्याची ठरताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात आले आहे. काही महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, त्यात त्रुटी राहिल्याने अनुदान बंद झाल्याचे समोर आले आहे. मात्र, या त्रुटी दुरूस्त करण्यासाठी राज्य सरकारकडून आणखी मुदतवाढ दिली गेली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीसाठी लाभार्थीना 30 एप्रिलपर्यंत संधी देण्यात आली आहे. यापूर्वी ही अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत होती. मात्र, अनेक जणींचे ई-केवायसी पूर्ण न झाल्याने सरकारने ही मुदत एक महिन्याने वाढवण्याचा निर्णय घेतला. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
आता राज्यातील सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी दुरुस्तीसाठी ही शेवटची संधी असल्याचेही तटकरेंनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पात्र महिलांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ सुरू ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही योजना जुलै २०२४ पासून सुरू असून, यात पात्र व महिलांना दरमहा १५०० रुपयांची मदत दिली जाते. ई-केवायसी अद्ययावत न केल्यास लाभ बंद होऊ शकतो.
जुलै २०२४ पासून योजना लागू
राज्यात गारपिटीसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे अनेक महिलांना ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नव्हती. त्यामुळे आता ३० एप्रिलपर्यंत ई-केवायसी सुधारण्याची अंतिम संधी देण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. ही योजना जुलै २०२४ पासून लागू असून, पात्र महिलांना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ई-केवायसी प्रक्रिया सप्टेंबरपासून सुरू झाली होती आणि यापूर्वीही मुदतवाढ देण्यात आली होती.
पीडित महिलांना न्याय देण्यावर भर
दरम्यान, भोंदू अशोक खरात प्रकरणावर बोलताना तटकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीची स्थापना केली असून, तपास एका अनुभवी महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! 1500 की 4500 खात्यात किती जमा होणार? आदिती तटकरेंची घोषणा