
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर; 'या' जिल्ह्याला रेड अलर्ट, तर मुंबई-ठाण्याला यलो अलर्टचा इशारा
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मुंबई केंद्राने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी पुढील तीन तासांचा यलो नाऊकास्ट अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी विनाकारण प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील मेड्डीगट्टा लक्ष्मी धरणातून सुमारे 9.71 लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून धरणाचे सर्व 85 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे प्राणहिता आणि गोदावरी नदीकाठच्या सखल भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
यंदाच्या मान्सूनमध्ये पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा 179.9 टक्के अधिक पाऊस झाला आहे. 31 जुलैपर्यंत अपेक्षित 309.3 मिमी पावसाच्या तुलनेत 556.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मावळ तालुक्यात 1680.3 मिमी इतका सर्वाधिक पाऊस झाला असून, खेड तालुक्यात सरासरीच्या 390.9 टक्के पाऊस नोंदवला गेला आहे.
उजनी धरणातून 80 हजार क्यूसेक आणि वीर धरणातून 43 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भीमा आणि चंद्रभागा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पंढरपुरातील पुंडलिक मंदिरासह अनेक मंदिरे पाण्याने वेढली असून, भीमा नदीवरील आठ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व घाटांवर भाविकांच्या स्नानावर बंदी घालण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे जालना जिल्ह्यातील 50 पैकी 39 महसूल मंडळांमध्ये 65 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मागील 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 83 मिमी पावसाची नोंद झाली असून भोकरदन तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. बदनापूर आणि मंठा तालुक्यांत तीन घरांचे नुकसान झाले असले तरी या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून बहुतांश नद्या-नाले पुन्हा प्रवाही झाले आहेत.