रत्नागिरी : महाराष्ट्र राज्यातील मनसेचे (MNS) पहिले नगराध्यक्ष वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांना अपात्र (Disqualified) ठरवण्यात आलं आहे. विविध प्रकारच्या भ्रष्टाचारांच्या (corruption issues) मुद्द्यावरून आज राज्याच्या नगरविकास मंत्रालयाने पुढील सहा वर्षाकरिता खेडेकर यांनी निवडणूक लढू नये असा आदेश जारी करण्यात आला आहे. पदाचा नियमबाह्य वापर केल्याचा वैभव खेडेकर यांच्यावर ठपका लावण्यात आला आहे. त्यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवण्यात आलं आहे.
[read_also content=”रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, सलग अकराव्या वेळी रेपो रेटमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे जाहीर https://www.navarashtra.com/business/for-the-11th-time-reserve-bank-of-india-kept-the-same-repo-rate-as-before-nrsr-265960.html”]
दरम्यान खेडेकर यांना अपात्र ठरवल्यानंतर शिवसेना पदाधिकार्यांनी खेड शहरातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे समोर छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच फटाक्यांची आतषबाजी करुन एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा केला. त्यामुळे खेडमध्ये पुन्हा एकदा मनसे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळाला आहे. रामदास कदम यांच्यासोबत झालेल्या वादाचा फटका खेडेकर यांना बसला आहे.
वैभव खेडेकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस आहेत. तसेच मनसेचे संपूर्ण राज्यातील एकमेव नगराध्यक्ष म्हणून त्यांना ओळखले जातात. मात्र दोन वर्षांपूर्वी शिवसेना गटनेते प्रज्योत तोडकरी यांनी जिल्हाधिकारी आणि नगर विकास मंत्रालयात खेडेकर यांच्या बाबत विविध भ्रष्टाचाराची प्रकरणाची तक्रार केली होती. याबाबत संपूर्ण चौकशी होऊन अखेरीस आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहीनं खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना पुढील सहा वर्षासाठी खेड नगरपालिकेच्या सदस्यत्व घेता येणार नसल्याची नोटीस त्यांना पाठवण्यात आली आहे.
दरम्यान, आपण शिवसेनेत गेलो नाही म्हणून माझ्यावर राजकीय हेतूनं प्रेरित ही कारवाई केली असल्याचं मनसेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर म्हणाले आहेत.






