
क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्राला अग्रस्थानी नेण्यासाठी राज्य सरकारचे मिशन; मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे ‘व्हिजन फॉर क्वांटम टेक्नोलॉजी इकोसिस्टम इन महाराष्ट्र’ या विषयावर आयआयएसईआर, पुणे येथील क्वांटम टेक्नोलॉजी फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संबोधन केले.
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान हे भविष्यातील विकासाचे 3 प्रमुख आधारस्तंभ ठरणार आहेत. या क्षेत्रात महाराष्ट्राने मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ तयार करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय क्वांटम मिशनशी सुसंगत असे महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन प्रभावीपणे राबवून राज्यात सक्षम क्वांटम इकोसिस्टीम उभारण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जग अतिशय वेगाने बदलत असून डेटा-आधारित अर्थव्यवस्थेपासून आता उच्च गतीच्या डेटा प्रोसेसिंगच्या युगात प्रवेश होत आहे. भविष्यातील जागतिक स्पर्धेत एआय, सेमीकंडक्टर आणि क्वांटम तंत्रज्ञान निर्णायक भूमिका बजावणार आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राप्रमाणेच क्वांटम क्षेत्रातही भारताने कुशल मनुष्यबळाच्या सामर्थ्यावर जागतिक नेतृत्व मिळविण्याची संधी साधली पाहिजे.
केंद्र सरकारने राष्ट्रीय क्वांटम मिशनसाठी सुमारे ₹6000 कोटींची तरतूद केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासन राज्याचे स्वतंत्र क्वांटम मिशन राबवत असून, प्रशिक्षित प्राध्यापकांच्या माध्यमातून राज्यात मजबूत क्वांटम इकोसिस्टीम उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढील टप्प्यात 500 प्रशिक्षक आणि त्यानंतर किमान 5000 हून अधिक क्वांटम प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, क्वांटम तंत्रज्ञानामुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय, अवकाश, उद्योग, संरक्षण अशा सर्वच क्षेत्रांत मोठी क्रांती होणार आहे. पुढील काही वर्षांत रोजगार क्षेत्राचे स्वरूप झपाट्याने बदलणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना भविष्यातील तंत्रज्ञानासाठी आजपासूनच सक्षम करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रात आयसर, सी-डॅक, टीआयएफआर, आयआयटी मुंबई, सीओईपी, व्हीएनआयटीसारख्या संस्थांमध्ये क्वांटम क्षेत्रातील क्षमता विकसित होत असून, या सर्व संस्थांची ताकद एकत्रित करून राज्याचे क्वांटम मिशन अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
प्रशिक्षणासाठी विकसित करण्यात आलेले अभ्यासक्रम, एलएमएस आणि ‘चंद्र’ व ‘सूर्य’ हे चॅटबॉट्स विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे नमूद करून या उपक्रमात सहभागी सर्व संस्था, तज्ज्ञ आणि प्राध्यापकांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अभिनंदन केले. यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.