
S.L.Bhyrappa, Marathi Literature,Kannada Literature,
विवेक व्यासपीठ, विवेक साहित्य मंच आणि विदिशा विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘डॉ. एस. एल. भैरप्पा: एक साहित्यिक वंदना’ या विशेष परिसंवादात त्या बोलत होत्या. यावेळी झालेल्या प्रकट मुलाखतीत त्यांनी भैरप्पांच्या साहित्याचा आवाका आणि मराठी साहित्याची तुलना यावर प्रकाश टाकला.
यावेळी बोलताना यावेळी बोलताना उमा कुलकर्णी म्हणाल्या की, वेगवेगळ्या टप्प्यांमधून कन्नड कादंबरी विकसित झाली. भैरप्पांनी या सगळ्या टप्प्यांच्या कादंबऱ्या वाचकांपुढे ठेवल्या, ही त्यांच्या लेखनाची ताकद आहे. ‘वंशवृक्ष’ ही मी अनुवादित केलेली भैरप्पांची पहिली कादंबरी. इथपासून लेखक आणि अनुवादक म्हणून आमचे ऋणानुबंध जुळले आणि भविष्यात ते उत्तम स्नेहा मध्ये देखील रूपांतरित झाले. त्यांच्या जवळपास सगळ्या कादंबऱ्यांचा पट खूप मोठा आहे. त्यांचा मोठेपणा भावणारा होता. भारतीय शास्त्रीय संगीतावर त्यांचे पहिले प्रेम आहे. त्यामुळे शास्त्रीय संगीत ऐकताना त्यांची सर्जनशीलता अधिक बहरून येत असे. त्यांच्या लेखनात शास्त्रीय संगीताची ही वैशिष्ट्ये दिसून येतात.
कादंबरी लेखनावरील त्यांची हुकूमत ही शास्त्रीय संगीताप्रमाणे लय, ताल आणि आलापीसारखी सुरेल आहे. यामुळे त्यांच्या निवेदनात देखील एक ठहराव जाणवतो. भैरप्पांनी त्यांच्या लेखनातून मांडलेली मूल्यव्यवस्था भारतीय होती. मी साहित्य हे गांभीर्याने घेत असल्याने भैरप्पांच्या या मूल्यांचा काही प्रमाणात परिणाम माझ्या व्यक्तिगत जीवन शैलीवर झाला. कारण त्यांच्या लेखनातून मला मूल्यांची दुसरी बाजू देखील समजली. ते मूल्य संवेदना मानतात आणि ती मूल्य संवेदना पक्की आहे. ती संवेदना आपल्याला प्रत्येक वेळी वर दिसत नसली तरी ती अस्तरासारखी असते. भैरप्पा गेल्यानंतर त्यांच्या अस्थींचे विसर्जन मला नाशिकमध्ये करता आले. यानिमित्ताने मला ऋषीऋण फेडता आले, असे मी मानते.
यावेळी बोलताना दिलीप करंबेळकर म्हणाले की, तत्त्वज्ञान या विषयाचा भैरप्पा यांचा सखोल अभ्यास होता. त्यांच्या कादंबऱ्यांमधून या तत्वज्ञानाची मूल्यात्मक मांडणी झालेली आहे. मात्र, या मांडणीमुळे त्यांच्या कादंबऱ्या किचकट झाल्या नाही, तर वाचनीय झाल्या. ही त्यांच्या कादंबरी लेखनाची ताकद आहे.
यावेळी बोलताना श्रीधर लोणी म्हणाले की, अनुवाद ही सर्जनात्मक कला असून उमा कुलकर्णी यांनी भैरप्पांचे साहित्य अनुवादित करून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. सहा दशकांहून अधिक काळ लेखन करणाऱ्यां भैरप्पांनी नाना विषयांना हात घातला. भैरप्पा यांच्या प्रादेशिक मर्यादा नाही. तत्वज्ञान हा भैरप्पांच्या अभ्यासाचा विषय असला तरी त्यांचा पींड कादंबरीकाराचा होता. कादंबरी म्हणजे सत्याच्या जाणीवेचा शोध असे ते म्हणायचे. त्यांच्या सामाजिक जाणीवा टोकदार असल्या तरी ते प्रतिक्रियावादी नव्हते. त्यांनी सगळ्या समाजाकडे डोळसपणे पाहिले आणि न्यूनतेवर तसेच हिनतेवर भाष्य केले. साहित्य हे क्रांतीला चालना देते, पण ते क्रांतीचे साधन नाही, असे ते म्हणायचे.
यावेळी बोलताना प्रा. डॉ. रूपाली शिंदे म्हणाल्या की, भारतीय स्त्रीत्वाचा सत्यांश शोधण्याची गरज आहे. भैरप्पांच्या कादंबरीतील स्त्रिया दुबळ्या नाहीत. स्वार्थी आणि सत्ता प्रिय असण्याच्या मानवी वृत्तींचा शोध भैरप्पा त्यांच्या कादंबरीतून घेतात. हा शोध स्त्री आणि पुरुषांच्या मानसिकतेचा सुद्धा आहे.स्री आणि पुरुष यांच्या सहजीवनातून जगण्याचा, तसेच माणसाच्या मर्यादा आणि हीनत्वाचा धागा भैरप्पांच्या कादंबऱ्या उकलत जातात. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी यांनी केले. सूत्रसंचालन सायली शिगवण यांनी केले.