
पुण्यातील आंबिल ओढा कॉलनीत भीषण आग; मीटर रूमला अचानक आग लागली अन्...
पुणे : आंबिल ओढा कॉलनीतील सानेगुरुजी नगर येथे शनिवारी सकाळी भीषण आग लागली. पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील मीटर रूमला ही आग लागल्याची माहिती सध्या दिली जात आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी, या घटनेने वसाहतीतील असुरक्षित आणि जर्जर स्थिती पुन्हा एकदा उघड केली आहे.
गेल्या काही वर्षांत अशा तीन आग लागल्यानंतरही महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. आग विझविण्यास विलंब झाला आणि त्याची माहिती प्रशासनाला बराच वेळ मिळाली नाही. वसाहतीतील इमारतींची ढासळलेली स्थिती, असुरक्षित विद्युतजाळे आणि दुरुस्तीअभावामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सत्ताधारी भाजपचे तीन माजी नगरसेवक स्वतः या वसाहतीत राहत असूनही सुधारणा झालेल्या नाहीत.
हेदेखील वाचा : आगीशी खेळणं तरुणीला महागात पडलं! तोंडातून निघू लागल्या ज्वाळा, लोकांनी मारून मारून विझवली आग; Video Viral
युवक काँग्रेसचे सागर धाडवे यांनी या घटनेनंतर मनपा प्रशासन आणि सत्ताधारी पक्षावर थेट आरोप केले. त्यांनी म्हटले की, मनपा वसाहतींच्या दुरुस्ती व देखभालीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले जातात. पण प्रत्यक्षात परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. निधी कुठे जातो याबाबत प्रशासनाने उत्तर द्यावे. ठेकेदार आणि सत्ताधाऱ्यांचे संगनमत मनपा कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे धाडवे यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले, मागील तीन आगींनंतर कोणताही पंचनामा किंवा संबंधितांवर कारवाई झाली नाही, हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे गंभीर उदाहरण आहे. कर्मचारी शहराची सेवा बजावतात, पण त्यांच्या राहत्या घरांची अवस्था प्रशासन जाणीवपूर्वक दुरुस्त करत नाही का? हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
…आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल
युवक काँग्रेसने या प्रकरणी तत्काळ चौकशी करण्याची, आगीचा पंचनामा व दुरुस्तीतील संभाव्य भ्रष्टाचाराची स्वतंत्र तपासणी करण्याची मागणी केली आहे. मनपा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही सागर धाडवे यांनी दिला आहे.
विट्यात दुकानाला आग
दुसऱ्या एका घटनेत, सांगलीच्या विटा येथील जुन्या वासुंबे रस्त्यावरील असणाऱ्या सावरकरनगरमध्ये विष्णू जोशी यांचे जय हनुमान स्टील सेंटर अँड इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान आहे. तीन मजली इमारतीमध्ये सर्वात खालच्या मजल्यावर दुकान आहे. तर वरच्या दोन मजल्यांवर जोशी कुटुंब वास्तव्याला आहेत. या दुकानाला आग लागल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. ही आग नेमकी कशामुळे लागली याबद्दलचे कारण समोर आलेले नाही. मात्र शॉर्टसर्किटमुळे किंवा दुकानातील फ्रिजच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.