
फोटो सौजन्य - Social Media
बुलढाणा जिल्ह्यात प्लास्टिकमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेच्या दृष्टीने प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक सर्व पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना पाठविण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
प्रशासनाने एकेरी वापरातील प्लास्टिकवर नियंत्रण, प्लास्टिक कचऱ्याचे स्रोतस्थानी वर्गीकरण, संकलन, पुनर्वापर आणि शास्त्रोक्त विल्हेवाट यावर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नागरिकांमध्ये प्लास्टिकमुक्त जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतींना कचरा व्यवस्थापनाची योग्य यंत्रणा उभारणे, शाळा, बचत गट आणि ग्रामस्थांचा सहभाग वाढवणे, तसेच आठवडी बाजारात कापडी पिशव्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नियमांनुसार सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक कचरा फेकल्यास 100 ते 500 रुपये, प्लास्टिक जाळल्यास 500 ते 2 हजार रुपये, तर अनधिकृतपणे प्लास्टिक कचरा टाकल्यास 500 ते 5 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. बंदी असलेल्या एकेरी वापराच्या प्लास्टिक वस्तूंची विक्री किंवा साठा आढळल्यास 1 हजार ते 5 हजार रुपये दंड, पुनरावृत्ती झाल्यास दुप्पट दंड आणि वारंवार नियम मोडल्यास 25 हजार रुपयांपर्यंत दंड व तीन महिन्यांपर्यंत कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.
याशिवाय जत्रा, उत्सव, विवाह समारंभ आणि धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजकांना निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणे, नाले आणि जलस्रोतांमध्ये प्लास्टिक कचरा टाकण्यास प्रतिबंध करण्यासह उघड्यावर प्लास्टिक जाळण्यावरही कठोर कारवाई केली जाणार आहे. जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सतीश देशमुख यांनी सर्वांनी सहकार्य करून बुलढाणा जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्याचे आवाहन केले आहे.