MPSC च्या CBT आणि Normalization विरोधात काँग्रेसचे बेमुदत आंदोलन; बेलापूर मुख्यालयाबाहेर साखळी उपोषणाला सुरुवात
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पर्धा परीक्षा CBT (Computer Based Test) पद्धतीने घेण्याचा तसेच Normalization पद्धत लागू करण्याचा घेतलेला निर्णय राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर विषय आहे. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दुपारी १२ वाजता सीबीडी बेलापूर येथील MPSC मुख्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसादात सुरुवात झाली.
आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी तसेच राज्याच्या विविध भागांतून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्याला भक्कम पाठिंबा दिला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या या मागणीला सक्रिय पाठिंबा दिला आहे. अधिवेशनातही महाविकास आघाडीच्या आमदारांनी हा प्रश्न प्रभावीपणे सभागृहात मांडला. याशिवाय MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून काँग्रेसचे प्रतिनिधी, विद्यार्थी व विविध विद्यार्थी संघटनांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंती दोन वेळा करण्यात आली होती. मात्र, त्यास कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.
२८ जून २०२६ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे स्पष्ट इशारा देण्यात आला होता की, पुढील दहा दिवसांत CBT व Normalization संदर्भातील निर्णय मागे घेतला नाही, तर काँग्रेस विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरेल. शासन आणि MPSC प्रशासनाने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजपासून हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा दळवी, प्रदेश सरचिटणीस तथा रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष धनंजय रामकृष्ण शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग सरचिटणीस दिगंबर राऊत, राज्य सरचिटणीस आनंद सिंह, महिला काँग्रेस सरचिटणीस व नवी मुंबई शहर जिल्हा प्रभारी अध्यक्ष उज्वला साळवे, राज्य सचिव व पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष मा. श्रुती म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपोषणात सहभागी झाले आहेत.
सरकारने अखेर घोषणा केलीच ! ‘या’ वाहनांना नाही द्यावा लागणार आता टोल
MPSC ने CBT व Normalization संदर्भातील निर्णय तात्काळ मागे घ्यावा, विद्यार्थ्यांशी व त्यांच्या प्रतिनिधींशी खुली चर्चा करावी आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या मान्य कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू असून त्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.






