
अभाविपच्या पुढाकारातून सार्वजनिक परीक्षांमधील सुधारणांवर गोलमेज परिषद
नीता परब / मुंबई : देशातील सार्वजनिक आणि स्पर्धात्मक परीक्षांची विश्वासार्हता अधिक बळकट करण्यासाठी पारदर्शक, सुरक्षित, उत्तरदायी आणि विद्यार्थी-केंद्रित परीक्षा व्यवस्था उभारण्याची गरज शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), मुंबई आणि विद्यार्थी निधी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “सार्वजनिक परीक्षांमधील सुधारणा : गोलमेज परिषद” मध्ये परीक्षा व्यवस्थेतील विविध आव्हाने आणि त्यावरील व्यवहार्य उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. मुंबई रामनारायण रुईया महाविद्यालय,येथील परिषद कक्षात ही गोलमेज परिषद पार पडली. या परिषदेस अभाविपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. मंदार भानुशे तसेच अायअायएम मुंबईचे संचालक मनोज तिवारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मुंबईतील विविध विद्यापीठे व महाविद्यालयांचे प्राध्यापक, सिनेट सदस्य, प्राचार्य, संस्थाचालक, परीक्षा नियंत्रक, विद्यार्थी प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ आणि संबंधित क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले हाेते.
अलीकडील नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका सुरक्षा, मूल्यमापन प्रक्रिया, निकालातील पारदर्शकता, तक्रार निवारण आणि परीक्षा यंत्रणेचे उत्तरदायित्व हे विषय पुन्हा ऐरणीवर आले आहेत. या पार्श्वभूमीवर परीक्षा सुधारणा केवळ प्रश्नपत्रिका किंवा परीक्षा पद्धतीपुरत्या मर्यादित न ठेवता प्रश्नपत्रिका निर्मितीपासून निकाल आणि तक्रार निवारणापर्यंत संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत करण्याची आवश्यकता परिषदेत अधोरेखित करण्यात आली.
‘बेरोजगार युवक-युवतींची संख्या मोठी असली, तरी…’; काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?
अभाविपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. मंदार भानुशे* यांनी परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. परीक्षा ही केवळ विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीची चाचणी न राहता त्यांच्या आकलन, चिकित्सक विचार, कौशल्ये, सर्जनशीलता आणि ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग करण्याच्या क्षमतेचे मूल्यमापन करणारी प्रक्रिया असावी, असे त्यांनी सांगितले. परीक्षा सुधारणांसाठी शासन, परीक्षा यंत्रणा, विद्यापीठे, महाविद्यालये, शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षणतज्ज्ञ यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अायअायएम मुंबईचे संचालक मनोज तिवारी यांनी अायअायएम मुंबईतील परीक्षा व्यवस्थेचे विशेष सादरीकरण केले. प्रश्नपत्रिका निर्मिती, सुरक्षितता, परीक्षा आयोजन, विविध स्तरांवरील नियंत्रण व पडताळणी, मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्यापर्यंतची प्रक्रिया त्यांनी उपस्थितांसमोर मांडली. स्पष्ट कार्यपद्धती, जबाबदाऱ्यांचे योग्य विभाजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि बहुस्तरीय पडताळणी यांच्या माध्यमातून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता व विश्वासार्हता कशी निर्माण करता येते, याचे उदाहरण त्यांनी दिले.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंधित परीक्षा व्यवस्था ही निष्पक्ष, पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह आणि विद्यार्थी-केंद्रित असणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या केवळ स्मरणशक्तीचे नव्हे, तर त्यांच्या ज्ञानाचा उपयोग, कौशल्ये, आकलन, चिकित्सक विचार आणि समस्या सोडविण्याची क्षमता यांचे मूल्यमापन करणारी परीक्षा व्यवस्था निर्माण करण्यासाठी विविध घटकांनी एकत्रितपणे पुढाकार घेणे आवश्यक आहे. या दिशेने अभाविपच्या पुढाकारातून झालेली ही गोलमेज परिषद परीक्षा सुधारणांच्या व्यापक प्रक्रियेला निश्चितच दिशा देणारी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
या परिषदेस अभाविप कोकण प्रदेश अध्यक्ष वैद्य. कैलास सोनमनकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अपर्णा कुलकर्णी, मुंबई महानगर अध्यक्ष प्रा. संदीप शिंदे, मंत्री अभिषेक पवार आणि संघटनमंत्री अमित पटले यांचीही विशेष उपस्थिती हाेती.