...तर तुम्हीही लाडकी बहीण योजनेतून होऊ शकता बाद; गडचिरोलीत 25 हजार महिला ठरल्या अपात्र (File Photo : Ladki Bahin Yojana)
मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सत्तेत आलेल्या भाजप महायुतीने राज्यातील लाखो माता भगिनींची घोर फसवणूक केली आहे. मतांसाठी सरसकट सर्व बहिणींना १५०० रुपये देऊन त्यांची मते घेतली व सत्तेवर आल्यानंतर मात्र या बहिणींना दिलेल्या मदतीला कात्री लावण्याचे पाप केले जात आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
लाडकी बहीण ही योजना केवळ विधानसभा निवडणुकीत माताभगिनींची मते मिळवण्यासाठी होती, निवडणुकीनंतर भाजपा युती त्यांचे खरे रंग दाखवले असे आम्ही सातत्याने बजावले होते आणि शेवटी महायुतीच्या भावांनी लाडक्या बहिणींना सावत्रपणाची वागणूक देण्यास सुरुवात केली आहे. आधी सरसकट १५०० रुपये दिले आणि सत्तेवर आल्यानंतर दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले. तसेच सरकारने ५ लाख बहिणींना अपात्र केले असून, आणखी काही लाख बहिणींना असेच अपात्र केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, सरकारने लाभार्थी बहिणींना अपात्र ठरवण्याची कृती म्हणजे लाडक्या बहिणींशी केलेली गद्दारी असल्याचे टीकास्त्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोडले. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.
मुख्यमंत्री फडणवीस निवडणूक आयोगाची वकिली का करतात?
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदानात झालेल्या घोटाळ्याची आकडेवारीसह मांडणी करून निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले आहेत. सर्व प्रश्न अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत, त्यावर निवडणूक आयोग उत्तरे देत नाही. विधानसभा निवडणुकीतील निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचे स्पष्ट दिसत आहे, तेच राहूल गांधी यांनी विरोधी पक्षनेते या नात्याने सांगितले आहे. फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांना मिरच्या का झोंबल्या? भाजपाने निवडणूक आयोगाचे वकिलपत्र घेतले आहे का? असा सवाल पटोले यांनी केला.