
ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेचा खोळंबा; मालगाडीचे कपलिंग तुटले; मुंबईकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक पाऊण तास विस्कळीत
मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळ्यावरून कल्याण जंक्शनच्या दिशेने जाणारी रिकामी मालगाडी दुपारी सुमारे ३.४५ वाजता नेरळ स्थानकाजवळ पोहोचली असता तिचे सीबीसी कपलिंग आणि एअर ब्रेक होस पाईप अचानक तुटले. त्यामुळे मालगाडीचे तब्बल १६ डबे नेरळ रेल्वे फाटकाच्या मध्यभागीच अडकले, तर इंजिनासह पुढील भाग नेरळ स्थानकाच्या दिशेने पुढे गेला.
या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे फाटकावरील रस्ते वाहतुकीसह मुंबईकडे जाणारी मुख्य रेल्वे वाहतूकही ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले. सीबीसी कपलिंग आणि एअर ब्रेक होस पाईप दुरुस्त केल्यानंतर सायंकाळी सुमारे ४.३० वाजता मालगाडी पुन्हा मार्गस्थ करण्यात आली.
मात्र या काळात मध्य रेल्वेच्या मुंबईकडे जाणाऱ्या अनेक लोकल गाड्या विविध स्थानकांवर खोळंबून राहिल्या. ऐन गर्दीच्या वेळेत सेवा विस्कळीत झाल्याने हजारो प्रवाशांना उशीर, गर्दी आणि गैरसोयीचा सामना करावा लागला.
या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या देखभाल आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रवाशांनी चिंता व्यक्त करत सांगितले की, हा बिघाड मालगाडीत झाला ही बाब सुदैवाची ठरली. जर अशीच घटना प्रवाशांनी भरलेल्या लोकल गाडीत घडली असती, तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता आली नसती. त्यामुळे रेल्वेच्या तांत्रिक तपासणी आणि देखभाल व्यवस्थेत अधिक काटेकोरपणा आणण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.