
'लाडकी बहीण योजना बंद करून त्याऐवजी आता...'; अॅड. गुणरत्न सदावर्तेंची मागणी
मुंबई : महायुती सरकारसाठी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची ठरलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही योजना बंद करून त्याऐवजी शेतकरी, शेतमजूर आणि महिलांच्या रोजगारासाठी निधी द्यावा, अशी मागणी केली.
मराठा समाजाच्या महामंडळाला १५० कोटी रुपयांची मदत देण्यात आल्याचा उल्लेख करताना त्यांनी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे तसेच इतर समाजांच्या महामंडळांना मोठ्या प्रमाणात निधी देण्याची गरज व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या विहिरींचे रखडलेले पैसे तातडीने द्यावेत, कांद्याला किमान २ हजार रुपये भाव मिळावा आणि पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांना प्रतिएकर १० हजार रुपये आगाऊ मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
आम्ही महिलांच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट करत सदावर्ते म्हणाले की, महिलांना थेट पैसे देण्यापेक्षा त्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वाढवावी, ग्रामीण भागातील महिलांच्या रोजंदारीत वाढ करावी आणि मनरेगा सारख्या योजनांत अल्पभूधारक महिलांना अधिक लाभ द्यावा. महिलांना सक्षम करण्यासाठी रोजगार आणि शिक्षण महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण आवाहन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या e-KYC प्रक्रियेबाबत सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा आणि खोट्या बातम्या व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आणि महिला व बालविकास विभागाने एक महत्त्वाचे स्पष्टीकरण जारी केले आहे. सोशल मीडियावरील भ्रामक दाव्यांवर विश्वास ठेवून महिलांनी कोणत्याही शासकीय कार्यालयात गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
लाभार्थ्यांना e-KYC बंधनकारक
लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडित सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांना e-KYC करणे बंधनकारक करण्यात आले होते. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास बँकेत पैसे जमा होणार नाहीत, असे सरकारने आधीच स्पष्ट केले होते. मात्र, या प्रक्रियेची अंतिम मुदत आता संपली असून राज्यातील लाखो महिलांचे e-KYC अद्याप अपूर्ण आहे. यामुळे संबंधित महिलांना योजनेचा लाभ मिळणे तात्पुरते बंद झाले आहे.