'लाडकी बहीण' योजनेच्या e-KYC बाबत महिला व बालविकास विभागाचा मोठा इशारा (Photo Credit- X)
याच दरम्यान सोशल मीडियावर एक खोटी बातमी वाऱ्यासारखी पसरली. तांत्रिक अडचणींमुळे ज्या महिलांचे e-KYC होऊ शकले नाही, त्यांनी आपले सर्व अधिकृत दस्तऐवज थेट जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जमा करावेत, असा दावा या बातमीत करण्यात आला होता. या अफवेला बळी पडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शेकडो महिला कागदपत्रे घेऊन शासकीय कार्यालयांमध्ये चकरा मारू लागल्या. या वाढत्या गर्दीची आणि संभ्रमाची दखल घेत अखेर सरकारने अधिकृत परिपत्रक काढून यावर स्पष्टीकरण दिले आहे.
महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे की, “ज्या महिला मुदतीत आपले e-KYC पूर्ण करू शकलेल्या नाहीत, त्यांनी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात येून कागदपत्रे जमा करावीत, असे कोणतेही निर्देश किंवा आदेश शासनाने जारी केलेले नाहीत.” योजनेची e-KYC करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल रोजीच संपली आहे. त्यामुळे मुदत संपल्यानंतर कार्यालयात कागदपत्रे स्वीकारली जात असल्याच्या बातम्या पूर्णपणे निराधार आणि चुकीच्या आहेत, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
महिला व बालविकास विभागाने सर्वसामान्य जनतेला आणि विशेषतः महिला भगिनींना आवाहन केले आहे की, त्यांनी अशा कोणत्याही सोशल मीडियावरील मेसेज किंवा भ्रामक बातम्यांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही अधिकृत निर्णयाची माहिती केवळ सरकारी संकेतस्थळांवर किंवा अधिकृत प्रसिद्धीपत्रकांद्वारेच दिली जाते. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडून स्वतःचा वेळ आणि श्रम वाया घालवू नये.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी १ एप्रिल रोजी जाहीर केले होते की, तांत्रिक अडचणींचा सामना करणाऱ्या महिलांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC सुधारणेसाठी ३० एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही वाढीव मुदत संपल्यानंतरही ज्या लाभार्थ्यांनी आवश्यक पडताळणी केली नाही, त्यांना अपात्र ठरवून सध्या योजनेचा लाभ देणे थांबवण्यात आले आहे.
Ladki Bahin Yojana: दोन महिने उलटले, पण हप्ता नाहीच; लाभार्थी महिलांचा सरकारविरोधात संताप






