
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तीन दिवस टोल माफी (Photo Credit- X)
यंदा एकविरा देवीची मुख्य यात्रा मंगळवार, बुधवार आणि गुरुवार अशा तीन दिवसांच्या कालावधीत संपन्न होत आहे. 24 एप्रिलपासून या उत्सवाला सुरुवात होणार असून ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भाविक खासगी वाहनांनी लोणावळ्याकडे रवाना होतात. या काळात टोलनाक्यांवर होणारी गर्दी आणि आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी ही विशेष सवलत देण्यात आली आहे.
देवी भक्तांसाठी आनंदाची बातमी — एकविरा आईच्या यात्रेसाठी तीन दिवस टोल माफ! pic.twitter.com/P7X4os90Pl — Balya Mama – Suresh Rekha Gopinath Mhatre (@MeBalyaMama) March 22, 2026
खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्सप्रेसवेवरील टोल प्रशासनाने भाविकांच्या मागणीचा सकारात्मक विचार केला आहे. मात्र, ही टोल माफी सरसकट नसून त्यासाठी खासदार सुरेश म्हात्रे यांचे अधिकृत टोल माफीचे पत्र सोबत असणे आवश्यक आहे. टोल नाक्यावर संबंधित वाहनचालकाने हे पत्र दाखवल्यानंतरच त्यांना शुल्कातून सवलत दिली जाईल.
दरवर्षी यात्रेच्या काळात टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांशी होणारे वादाचे प्रसंग आणि लांबच लांब रांगांमुळे भाविकांना मनस्ताप सहन करावा लागतो. भाविकांच्या भावना आणि मागणी लक्षात घेऊन खासदारांनी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. “भाविकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे आणि सुरक्षितरीत्या प्रवास करून देवीचे दर्शन घ्यावे,” असे आवाहन खासदार सुरेश म्हात्रे यांनी केले आहे.
लोणावळ्यातील एकविरा मंदिर हे केवळ आगरी-कोळी समाजाचेच नव्हे, तर सर्वधर्मीय भाविकांचे श्रद्धास्थान आहे. यात्रेच्या तीन दिवसांत कार्ला गडावर पालखी सोहळा, भजन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. टोल माफीच्या निर्णयामुळे यंदा भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.