फोटो सौजन्य AI
या मोहिमेच्या माध्यमातून मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याला (बीएलओ) प्रत्येकाच्या घरी जाऊन मतदान नोंदणी अर्ज देऊन त्यांच्याकडून भरून घ्यायचा होता. हा अर्ज संगणीकृत (डिजिटलाईझ) करायचा आहे. या मोहिमेला दोनदा मुदतवाढ देण्यात आली.
नागपूर ग्रामीण आरटीओमधील कथित भ्रष्टाचार! १० ते १५ कोटींच्या मासिक खंडणीचा दावा…
सोमवार, १७ ऑगस्ट रात्री १२ वाजता या मोहिमेची मुदत संपली. नागपूर जिल्ह्यात ४६, ३८, ५८९ मतदार आहेत. यातील सर्वच मतदारांच्या घरापर्यंत बीएलओ पोहोचल्याचा दावा प्रशासनाचा आहे. यातील ३१, ८८, ९३० मतदारांचे अर्ज संगणीकृत करण्यात आले होते.
२३ हजारांवर मतदारांचे अर्ज संगणीकृत होणे बाकी असून मुदतीत ते होतील, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर १४ लाख २६ हजार १०६ मतदारांचे अर्जच अद्याप प्रशासनाला प्राप्त झाले नाही. त्यामुळे या सर्व मतदारांची नावे यादीतून वगळण्यात येतील. प्रारूप मतदार यादी २४ ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे त्यानंतरच मतदारांची नावे स्पष्ट होतील .
१४ लाख २६ हजार १०६ मतदारांमध्ये सर्वाधिक ९ लाख ०६ हजार २९७मतदार हे शहरातील सहाही विधानसभा मतदार संघातील आहेत. मध्य नागपूर वगळता इतर पाच विधानसभा मतदार संघातील साधारणतः दीड लाख मतदारांचा शोध लागला नाही. सर्वच मतदार संघात बेपत्ता मतदारांचा आकडा जवळपास सारखाच असल्यानेही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जे मतदार प्रामाणिकपणे मतदान करतात, अशांनाही या प्रक्रियेतून वगळण्यात आले. अशा हजारो मतदारांची २००२ च्या प्रमाण यादीत नाव नाही. तर काहींची २०२४ च्या मतदार यादीत नावे आहेत.
अशा मतदारांना मतदार यादीतील नाव शोधतांना चांगलीच दमछाक झाली. शिवाय, मतदार ओळखपत्र व यापूवीं लोकसभा, विधानसभा तसेच मनपा निवडणूकीत मतदान केलेल्या मतदान केंद्राचीही माहिती दिली.
तरीही, त्यांचा बीएलओ कोण, हेच कळेनासे झाल्याने नाहकपणे अशा मतदारांना या यादीतून बाहेर पडावे लागत आहे. ही जिल्हा निवडणूक विभागाची मोठी चूक आहे. एकाच कुटुंबातील एकाला वगळून इतरांची नावे मतदार यादीत कशी, एकालाच का वगळले याचे उत्तर मात्र प्रशासनाकडे नव्हते.


