
कॅन्सरशी लढून जिंकली पण धरणात बुडून मरण पावली; सेल्फीचा 'तो' नाद बेतला जीवावर
नाशिक : नाशिकरोड परिसरातील चेहेडी डॅम येथे शुक्रवारी (दि. १) सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. धार्मिक साहित्याचे विसर्जन करून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना पाय घसरून पाण्यात पडल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. गिता रंजन दास (५२, रा. सिद्धार्थनगर, शिर्डी, ह.मु. नाशिक) असे मृत महिलेचे नाव आहे.
दास कुटुंब मूळचे शिर्डी येथील रहिवासी असून, गेल्या काही दिवसांपासून ते नाशिकमध्ये वास्तव्यास होते. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गिता दास आणि त्यांचे पती रंजन दास हे घरातील धार्मिक साहित्याचे विसर्जन करण्यासाठी चेहेडी डॅम परिसरात गेले होते. विसर्जन आटोपल्यानंतर पुलावर उभे राहून मोबाईलमध्ये फोटो काढत असताना अचानक हवेच्या झोतामुळे गिता यांचा तोल गेला आणि त्या थेट डॅमच्या खोल पाण्यात कोसळल्या. पत्नी पाण्यात पडल्याचे पाहून रंजन दास यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, परिसरात वेळीच मदत उपलब्ध होऊ शकली नाही.
दरम्यान, काही काळानंतर त्यांना पाण्याबाहेर काढून दुपारी एक वाजेच्या सुमारास नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप पवार यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. दुर्दैवाची बाब म्हणजे गिता दास यांनी काही काळापूर्वीच कर्करोगासारख्या गंभीर आजारावर उपचार घेऊन यशस्वी मात केली होती. या आजाराशी लढण्यासाठी त्यांनी अनेक व्यक्ती व संस्थांकडून आर्थिक मदतही घेतली होती.
मावळ तालुक्यातही दुर्घटना
दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि. १) दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तरुणांवर काळाने झडप घालत जाधववाडी धरणात सेल्फी घेण्याच्या नादात तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. याच दिवशी पवना नदी येथेही एका तरुणाचा जीव गेल्याने मावळमध्ये एकाच दिवसात चार जणांचा बळी गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
जाधववाडी धरणावर घडली दुर्घटना
मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथील जाधववाडी धरणावर ही दुर्घटना घडली आहे. धरणात पोहण्यासाठी उतरल्यानंतर पाण्याची खोली न समजल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अजय गारुडे, अनिकेत पवार आणि संतोष येडके अशी मृत तरुणांची नावे असून ते तिघेही पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरातील रहिवासी होते. भोसरी एमआयडीसीतील खासगी कंपनीत काम करणारे हे तरुण मूळचे परभणी जिल्ह्यातील होते. सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत मावळमध्ये फिरण्यासाठी आले असताना ही दुर्घटना घडली आहे.