मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना आमदारकीची शपथ देण्यासाठी ७,८ आणि ९ डिसेंबर रोजी मुंबईत विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
पटोले नेमकं काय म्हणाले?
विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपा युतीचे सरकार आले असले तरी आपल्या मतदानाने हे सरकार आलेले नाही अशीच भावना जनतेला वाटत आहे. जनतेच्या मतांचे हे सरकार नाही. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना आहे. जनभावनेचा आदर करत महाविकास आघाडीतील विधानसभा सदस्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं पटोले म्हणाले.
विधानसभा परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी महाविकास आघाडीचे नेते भेट घेऊन पुढील रणनिती ठरवतील. भाजपा युतीचे सरकार हे जनतेचे सरकार नाही. मतांची चोरी करून आलेल्या सरकारने आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्यावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली. तरुण मुले व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. नागपूर भागात ७७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या झाल्या पण भाजपा युतीला त्याचे काही देणेघेणे नाही. त्यांनी सरकारचा शपथविधी सोहळा धुमधडाक्यात घेतला.
हे सुद्धा वाचा : बॅलेट पेपरवर मतदान घ्या, नाहीतर आम्ही…; काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या इशारा
मारकरवाडीची लढाई…
लोकशाही व मताचा अधिकार वाचवण्याची जबाबदारी आमची आहे. मारकडवाडीतून जी ठिणगी पेटलेली आहे ती देशात पोहचवण्याचा काँग्रेसचा संकल्प आहे. यासंदर्भात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली असून, बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या आंदोलनावर दिल्लीत तयारी सुरु आहे. सर्व तयारी झाल्यानंतर मारकडवाडीचे आंदोलन देशव्यापी करण्यासंदर्भात निर्णय होईल, असेही नाना पटोले म्हणाले.
आयकर विभागाने जप्त केलेली अजित पवारांची १ हजार कोटींची संपत्ती परत देण्याच्या मुद्द्यावर बोलताना नाना पटोलो म्हणाले की, ना खाऊंगा, ना खाने दुंगा ही भूमिका नरेंद्र मोदींच्या लोकांसाठी नाही. भाजपाबरोबर असलेल्या नेत्यांच्या भ्रष्ट कारभारावर पांघरूण घालण्याचा हा प्रयत्न आहे असे पटोले म्हणाले.