अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं PM नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन, मराठी सारस्वतांना नमस्कार म्हणत मोदींचं...
“अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचं भाषण झालं. तेव्हा मी म्हटलं की फारच छान, तर त्यांनी मला गुजरातीमधून उत्तर दिलं. मला पण गुजराती अवडाची असं त्यांनी म्हटलं. देशाच्या आर्थिक राजधानीमधून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व सारस्वतांना माझा नमस्कार”, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठी केली.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून दिल्लीत सुरुवात झाली आहे. या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं आहे.
“मराठी साहित्य संमेलन अशा वेळी होत आहे, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण झाली आहेत. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३०० वर्ष पूर्ण झाली आहेत. तसेच आपल्याला या गोष्टींचा गर्व आहे की महाराष्ट्राच्या धर्तीवर १०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात झाली होती. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक वटवृक्षाप्रमाणे १०० वर्ष साजरी करत आहे. वेदांपासून ते स्वामी विवेकानंद यांच्यापर्यंत भारताच्या परंपरा आणि संस्कृती नव्या पिढींपर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या १०० वर्षांपासून करत आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
“आज जागतिक मातृभाषा दिवस आहे. तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला आहे. मी जेव्हा मराठी भाषेबाबत विचार करतो. तेव्हा मला संत ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आठवते. माझ्या मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके, म्हणजे मराठी भाषा ही अमृताहूनी गोड आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रति माझं प्रेम आहे. मी मराठी बोलण्याचा प्रयत्न नेहमी केला आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
आजही एखादा म्हणतो की, माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा? असा प्रश्न करत संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी पंतप्रधान मोदींचे नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली. तब्बल सात दशकांनी देशाची राजधानी दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यानंतर दुसऱ्या उद्घाटन सत्रात संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.