परभणी – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचा आज महाराष्ट्र दौरा आहे. महायुतीमधील राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची परभणीमध्ये सभा पार पडत आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत कॉंग्रेसला धारेवर धरले आहे. परभणीच्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीमध्ये केली. ‘परभणीकरांना माझा राम राम’ म्हणत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. त्याचबरोबर महाविकास आघाडीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
यंदाच्या निवडणूकीचे मुद्दे साधारण नाही
नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये विजयाचा विश्वास व्यक्त केला. भाषणामध्ये मोदी म्हणाले, तुम्ही दाखवलेल्या विश्वासातून मी विकास करुन दाखवेल. 2024 ची ही निवडणूक फक्त सरकार बनवण्यासाठी नाही तर या निवडणूकीतून भारताला विकसित करणे असे ध्येय असणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणूकीचे मुद्दे साधारण नाही. प्रत्येक पाऊल आणि संकल्प महत्त्वाचा आहे. आणि त्यामुळे ही पहिली निवडणूक असेल जी भारताला जगभरातील तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था करण्यासाठी होत आहे. फक्त 10 वर्षांमध्ये देशाने विकासाचा मोठा पल्ला गाठला आहे. 2014 पूर्वी आतंकवादी हल्ल्याची भीती, बॉम्ब हल्ला आणि शहीद जवानांचा त्रास अशा गोष्टींची चर्चा सर्वत्र होत होती. त्यानंतर अशा हल्ल्यांची चर्चा बंद झाली, असे नरेंद्र मोदी भाषणामध्ये म्हणाले आहेत.
कॉंग्रेस आणि खोटी शिवसेना याकूब मेमनची कबर सांभाळण्यात व्यस्त
पुढे नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. नरेंद्र मोदी म्हणाले, “शेतीवर अवलंबून असलेला हा प्रदेश असून यापूर्वी कॉंग्रेस आणि इंडी आघाडीने कधी तुमचे दुःख जाणून नाही घेतले. जलयुक्त शिवार सारख्या योजना सुरु झाल्या होत्या मात्र इंडी आघाडीवाल्यांची तुमच्या येवढे शत्रुत्व आहे की, त्यांनी योजना थांबवल्या. विकसित महाराष्ट्र हवा असेल तर इंडी आघाडीपासून खूप सतर्क राहवं लागणार आहे. कॉंग्रेस हा असा वेल आहे ज्यांची कोणती स्वतःची मुळं नाही आणि जमिनही नाही. आणि या वेलीला जे कोणी आधार देईल ती त्यांनाच वाळवून टाकणारी आहे. देशाच्या स्वातंत्र्यावेळी कॉंग्रेसने देशाचे विभाजन केले. स्वातंत्र्यानंतर काश्मीरचा प्रश्न निर्माण केला. 370 चे कारण सांगत बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान काश्मीरमध्ये लागू नाही केले. महाराष्ट्रातही इंडी आघाडीने जोपर्यंत सरकार चालवले तोपर्यंत निजामची सत्ता गेली आहे असे वाटलेच नाही. कॉंग्रेस आणि खोटी शिवसेना याकूब मेमन याची कबर सांभाळण्यामध्ये व्यस्त होती. या लोकांनी महाराष्ट्राचा आणि मराठावाड्याचा विकास होऊ दिला नाही,” असा घणाघात नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर केला.