
Mumbai Goa Highway
शिरगाव, प्रतिनिधी – निसार शेख : गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात दाखल होत असतानाच मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या दुरवस्थेने पुन्हा एकदा कोकणवासीयांचा संताप उफाळून आला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्योजक वामनराव पवार यांचे सुपुत्र तथा उद्योजक प्रशांत पवार यांनी फेसबुकवर केलेली संतप्त पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि प्रवासातील अडचणींचा सामना करावा लागतो. यंदाही अनेक ठिकाणी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या परिस्थितीवर प्रशांत पवार यांनी थेट सवाल उपस्थित केला आहे.
“वाहतूक पोलीस विभाग नेमके काय करत आहे? महाराष्ट्रातील मंत्री, आमदार आणि खासदारांकडे या परिस्थितीचे काय उत्तर आहे?” असा रोखठोक सवाल त्यांनी केला आहे.
केवळ आश्वासनांच्या राजकारणावर नाराजी व्यक्त करताना “फक्त आश्वासने नकोत, आता प्रत्यक्ष कृती हवी,” अशी स्पष्ट भूमिका प्रशांत पवार यांनी मांडली आहे. रस्ते, वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना कधी होणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
प्रशांत पवार यांच्या या पोस्टवर ‘कालनिर्णय’चे संपादक जयेंद्र साळगावकर यांनी केलेली कमेंटही चर्चेत आली आहे.
“कोकणाकडे खास लक्ष कोण देत नाहीत… आणि कोकणी जनता एकजूट दाखवत नाहीत,” असे म्हणत साळगावकर यांनी कोकणातील जनतेच्या एकजुटीचा मुद्दा उपस्थित केला.
कोल्हापुरातील जनतेने पक्षीय निष्ठा बाजूला ठेवून टोलविरोधात एकत्रित लढा दिल्याचा दाखला देत कोकणातही पक्षभेद विसरून जनतेने आपल्या प्रश्नांसाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आपण सहा-सात वर्षांपूर्वी याच प्रश्नावर आवाज उठवला होता आणि त्यावेळी आपली भूमिका वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झाली होती; मात्र अपेक्षित प्रमाणात कोणी पुढे आले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
जयेंद्र साळगावकर यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना प्रशांत पवार यांनीही कोकणाच्या प्रश्नांसाठी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकजूट होण्याची वेळ आल्याचे स्पष्ट केले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावर वर्षानुवर्षे आश्वासने मिळत आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही महामार्ग पूर्ण करण्याबाबत अनेकदा आश्वासने दिली; मात्र सरकारे बदलली, पक्ष बदलले, सत्ता आली-गेली, पण महामार्गाचा प्रश्न मात्र कायम असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
“कोकणातील जनतेने एकत्र येऊन आपल्या लोकप्रतिनिधींना — आमदार आणि खासदारांना — थेट प्रश्न विचारला पाहिजे. कोकणासाठी ठोस कृती का होत नाही?” असा सवाल प्रशांत पवार यांनी केला.
ही भूमिका कोणत्याही एका पक्षाच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट करताना प्रशांत पवार यांनी “कोकणाच्या बाजूने उभा राहणारा आवाज आता बुलंद झाला पाहिजे,” असे म्हटले आहे.
विद्यमान लोकप्रतिनिधी कोकणाचे प्रश्न प्रभावीपणे मांडू शकत नसतील, तर पर्यायाचा विचार करण्याची वेळ आली आहे, असा थेट इशाराही त्यांच्या प्रतिक्रियेतून देण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झालेला असतानाच प्रशांत पवार यांच्या या पोस्टमुळे कोकणातील रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि लोकप्रतिनिधींची भूमिका यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
आता कोकणातील जनता या मुद्द्यावर एकजूट होणार का? लोकप्रतिनिधींना थेट जाब विचारला जाणार का? आणि वर्षानुवर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न कायमस्वरूपी कधी सुटणार? हे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.