
मेढा / दत्तात्रय पवार : सातारा जिल्ह्यातील सहकारांमधील सर्वात महत्त्वपूर्ण व अग्रगण्य असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असून, सोसायटी मतदार संघासाठी प्रथम स्तरावर सोसायटी मतदारांसाठी ठराव घेतले जातात. ही ठराव प्रक्रिया 8 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावयाची आहे. बँकेच्या निवडणुकीच्या या पूर्व तयारीने सोसायट्यांचे ठराव घेण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू झाले असून, यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
जावळी तालुक्यात एकूण ४९ विकास सेवा सोसायटी कार्यरत आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत विधान परिषदेचे माजी आमदार शशिकांत शिंदे विरुद्ध ज्ञानदेव रांजणे असा सामना तालुक्यात रंगला होता. यामध्ये ज्ञानदेव रांजणे यांना केवळ मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीच थेट साथ मिळाल्याने त्यांनी दणदणीत विजय मिळवला होता. तर या पंचवार्षिक निवडणुकीत सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असलेले शशिकांत शिंदे नेमकी कोणती भूमिका घेणार याकडेच लक्ष असून त्यांनी देखील सचिव तसेच सोसायटी संचालक चेअरमन यांच्याशी संपर्क वाढवलेला पाहायला मिळत आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका निमित्ताने जिल्ह्यात मोर्चे बांधणीला सुरुवात
तालुक्यातील ४९ सोसायटीच्या निवडणुका ज्या-ज्या वेळेला झाल्या त्या-त्या वेळेला जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका आपल्या गटाकडे खेचून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे बहुतांश सोसायट्यांवर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचेच वर्चस्व पाहायला मिळत आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकात कुसुंबी गटात ज्ञानदेव रांजणे यांच्या पत्नी अर्चना रांजणे यांचा पराभव झाल्यामुळे त्यांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची जिल्हा बँक निवडणुकीसाठी जावळीतून ज्ञानदेव रांजणे यांनाच पसंती असलेली पाहायला मिळत आहे. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पहिल्या टप्प्यात ही निवडणूक आपल्या हातात घेण्याचे ठरवले असून, त्या अनुषंगाने मंगळवारी सातारा शहरालगत असलेल्या एका रिसॉर्टमध्ये तालुक्यातील सर्व सोसायट्यांचे संचालक यांची त्यांनी बैठक देखील घेतली असल्याची खात्रीशीर वृत्त आहे. एकंदरीतच जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीने तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.
अंकुश कदम यांची होणार एन्ट्री
जिल्हा बँक निवडणूक ही महत्वपूर्ण निवडणूक असून, या निवडणुकीत एकीकडे दीपक पवार हे दरेकर सोसायटीसह अन्य दोन ते तीन ठराव आपल्या समर्थकांचे करून घेताना पाहायला मिळतात. त्याचा नव्याने तालुक्याच्या राजकारणात एन्ट्री केलेले शिवसेनेचे नवी मुंबई संपर्कप्रमुख अंकुश कदम हे देखील या निवडणुकीत निवडणुकीवर लक्ष ठेवून असून ते देखील काही ठराव घेण्यासाठी प्रयत्नशील ल असलेले पाहायला मिळत आहे.
केळघर सोसायटीवरच विसंबून राहावे लागणार
जिल्हा बँक संचालक रांजणे यांनी केळघर सोसायटीतून आपल्या आंबेघर गावसाठी स्वतंत्र सोसायटी स्थापन केली खरी मात्र त्यांची या सोसायटी स्थापनेस तीन वर्षे पूर्ण न झाल्याने ती मतदानास पात्र होऊ शकत नाही. त्यामुळे रांजणे यांना केळघर सोसायटीवरच विसंबून राहावे लागणार आहे.
शिंदे यांना आपली स्वतःची ताकद लावावी लागणार
जावळी पंचायत समितीत तीन-तीन सदस्य अशी राजकीय परिस्थिती असताना सभापती निवड ही चिट्ठीवर होईल असे वाटत होते. मात्र, प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी भाजप सोबत सहकार्याची भूमिका ठेवत भाजपचे सभापती, उपसभापती बसवण्यास भाजपला मोठी मदत केली होती. यावेळी काही स्वयंमघोषित नेत्यांनी शिंदे साहेबांना जिल्हा बँकेत मदत केली जाणार आहे. अशी राजकीय हवा पसरवली होती. मात्र, तशी परिस्थिती सध्या दिसत नाही. शिंदे यांना आपली स्वतःची ताकद लावावी लागणार असेच राजकीय चित्र पहायला मिळत आहे.