
प्रभाग 25 मधील स्वच्छता अन् सफाईची कामे तातडीने पूर्ण करा; राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या प्रशासनाला सूचना
पुणे : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रभाग २५ मधील विविध भागांत पावसाळी जलवाहिन्यांच्या स्वच्छतेचा प्रत्यक्ष आढावा दौरा आयोजित करण्यात आला होता. मुसळधार पावसात या प्रभागातील अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडत असल्याने, तातडीने स्वच्छता व सफाईची कामे पूर्ण करण्याच्या सूचना विश्रामबाग वाडा प्रभाग समितीचे अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
या प्रभागातील विविध समस्यांच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांच्यासह विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या पाहणी दौऱ्यादरम्यान कचऱ्याचे क्रोनिक स्पॉट पूर्णपणे बंद करणे, ड्रेनेज सुधारणा, अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमण हटवणे, नदीपात्र सीमाभिंत बांधणे, रस्त्यांचे समपातळीकरण करणे, बंद पथदिवे दुरुस्त करणे आणि ठिकठिकाणी साचलेला राडारोडा तातडीने उचलणे, याबाबत प्रशासनाला सद्यस्थितीची माहिती प्रभागातील लोकप्रतिनिधींनी दिली.
यावेळी नगरसेविका स्वरदा बापट, नगरसेवक कुणाल टिळक आणि नगरसेविका स्वप्नाली पंडित या देखील उपस्थित होत्या. ‘कसब्याचे आमदार हेमंत रासने यांच्या सूचनेनुसार सर्व नगरसेवकांनी नागरिकांच्या दारी जात समस्या जाणून घेतल्या. पावसाळा तोंडावर असल्याने या सर्व समस्यांवर ‘टीम वर्क’ म्हणून काम करून सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी ‘कालबद्ध’ पद्धतीने तातडीने कार्यवाही करावी’, अशा स्पष्ट सूचना यावेळी प्रशासनाला देण्यात आल्याचे राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : आता नुसता धो धो पाऊस बरसणार! राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसादरम्यान या भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, नारायण पेठ आणि शुक्रवार पेठ येथील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याच्या घटना घडल्या होत्या. साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला होता. तसेच दोन दिवस या भागातील विद्युत पुरवठा देखील खंडित राहिला होता. या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने व्हाव्यात, या उद्देशाने या विशेष पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या महत्त्वाच्या सूचना आणि मागण्याही अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या.