
कडक उन्हाचा फटका ; आंबेगाव तालुक्यात उष्माघाताचा संशयित पहिला बळी
मंचर : आंबेगाव तालुक्यात उष्माघाताचा संशयित पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि.८) सायंकाळी समोर आली. शेतात कांदा काढणीच्या कामासाठी आलेल्या एका महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नकुशा बाळू सुपे (वय ३३) या खेड तालुक्यातील वाडा-सुपेवाडी येथील रहिवासी होत्या. त्या सध्या आंबेगाव तालुक्यातील आमोंडी येथे कांदा काढणीच्या कामासाठी आल्या होत्या. दुपारच्या सुमारास कडक उन्हात काम सुरू असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि त्या शेतातच कोसळल्या. सोबतच्या मजुरांनी त्यांना तातडीने शिनोली येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अन्यत्र हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
प्राथमिक माहितीनुसार, उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून, अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, दुपारच्या वेळेत उन्हात काम टाळावे व पुरेसे पाणी प्यावे, असे आवाहन मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक शिवाजीराव जाधव यांनी केले आहे.
जिल्ह्यात उष्माघात सदृश्य 12 रुग्ण दाखल
मे महिन्याच्या अखेरीस सर्वत्र सूर्य आग ओकत असून, संभाजीनगर जिल्ह्यातही तीव्र उष्णतेच्या लाटा वाढल्या आहेत. जिल्ह्यात उष्माघात सदृश्य १२ रुग्ण दाखल झाले होते. त्यांच्यावर आवश्यक उपचार करून त्यांना सुटी देण्यात आली. खबरदारी म्हणून जिल्ह्यात तालुकानिहाय उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. दरम्यान, पुढील तापमानातील अपेक्षित वाढ पाहता उष्माघाताबाबत नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले.
हीट स्ट्रोकमुळे मृत्यू कसा होतो?
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काहीवेळा शरीराचे तापमान झपाट्याने वाढते आणि शरीर थंड करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. हिट स्ट्रोक आल्यानंतर सगळ्यात आधी मेंदू, हृदय आणि किडनी यांसारख्या अतिमहत्वाच्या अवयवांवर लगेच परिणाम होतो. तसेच शरीरात वाढलेल्या तापमानामुळे मेंदूच्या पेशींचे नुकसान होते. गोंधळ, झटके येणे, कोमा किंवा मानसिक नियंत्रण हरवणे इत्यादी गंभीर लक्षणे दिसू लागतात. शरीर थंड ठेवण्यासाठी हृदयाला जास्तीचे काम करावे लागते, ज्यामुळे हृदयाच्या पेशी कमकुवत होऊन जातात.