File Photo : Rohan Patil
रोहन सुरवसे-पाटील आज शहरातील असंख्य लोकांना परिचित असलेले व्यक्तिमत्व. गेल्या १४ वर्षांपासून अविरत विविध आंदोलने करून सर्वसामान्यांसाठी अहोरात्र झटणारे म्हणून त्यांची ओळख. समाजातील कोणत्याही गरजू, पीडित, शोषित लोकांसाठी धावून जाणारे रोहन सुरवसे पाटील यांचा प्रजासत्ताक दिनी (दि.२६) वाढदिवस आहे.
माळशिरस तालुक्यातील कोंडबावी या गावातून एका कामानिमित्त ते पुण्यात आले आणि येथूनच त्यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले, कोणतेही आर्थिक पाठबळ नसलेले रोहन शेतकरी कुटुंबातले. लहानपणापासून समाजकार्याची आवड म्हणून त्यांनी २०१० सालापासून सामाजिक कार्याला सुरूवात केली. सर्वसमान्यांच्या प्रश्नांना पाठबळ देण्याचे काम आजही ते करत आहेत. २४ तास उपलब्ध अशीच त्यांची महती. २०१४ साली त्यांनी सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्यातरी पक्षाचे पाठबळ असणे गरजेचे, या हेतूने काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
२०२१ साली युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस म्हणून राज्यभरातून त्यांना भरघोस मतं मिळाली. त्यांनी यादरम्यान केलेले एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी आंदोलन, तलाठी भरती घोटाळा प्रकरणातील आंदोलन हे राज्यभर गाजले. याच दरम्यान २०२२-२३ मध्ये शहरात अनेक सर्वसामान्यांची बिल्डरकडून झालेल्या फसवणुकीत देखील त्यांनी प्रामुख्याने लक्ष घालत तत्कालीन महसूल मंत्र्यांकडे युवक काँग्रेसच्या वतीने सतत पाठपुरावा केल्याने फसवणूक झालेल्या जनतेला न्याय मिळवून दिला. त्यावेळी नोंदणी व मुद्रांक विभागातील काही अधिकारी, दुय्यम निबंधक, वरिष्ठ लिपीक हे याप्रकरणात दोषी असल्याचे सिद्ध झाले. जवळपास ४४ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन, विभागीय चौकशी त्यांच्यामुळे झाली.
शहरातील पब संस्कृती विरोधात देखील त्यांनी तत्कालीन आमदारांसह आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी पक्षासाठी सक्रीय काम केले. माजी आमदार आणि राजकीय गुरू मोहन जोशी यांच्यासोबत शहरातील वाहतुक समस्येसंदर्भात ‘वेकअप पुणेकर’ ही संकल्पना रोहन सुरवसे पाटील यांनी राबवली. त्यांचे वडील उमेश सुरवसे पाटील, आई आशा सुरवसे पाटील, पत्नी शिवानी सुरवसे पाटील आणि भाऊ अनिल यांच्या सदैव पाठबळामुळेच आज इथपर्यंत पोहोचल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यासोबतच जवळचे सहकारी आणि मित्र यांनी देखील वेळोवेळी आधार दिल्याचे देखील ते म्हणाले.
कोरोना काळात १० हजार किरणा कीटचे वाटप, ५० हजार सॅनिटायझर आणि मास्क शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना त्यांनी दिले. यासोबतच रुग्णसेवेसाठी देखील नेहमी कटीबद्ध असलेल्या रोहन सुरवसे पाटील यांनी १६ हजार रुग्णांसाठी त्यांच्या ‘सारथी फाऊंडेशन’च्या माध्यमातून काम केले. यातील अनेकांसाठी मोफत उपचार, गुडघ्यांचे ऑपरेशन, मणक्यांचे आजार यासह बायपास शस्त्रक्रिया त्यांनी करून घेतल्या. आजही शहरातील अनेक गरजू मुलांच्या शिक्षणाचा खर्च त्यांच्या फाऊंडेशनद्वारे केला जातो असे सांगत, यामुळे मला सुखाने झोप येते असे ते सांगतात.
नुकत्याच झालेल्या बोपदेव घाट बलात्कार प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिस आयुक्तांकडे केली. शहरातील बंद पडलेले ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात पाठपुरावा करून ते सुरू केले. आजही दिवसाला साधारण १०० फोन त्यांना शहरातील सर्वसामान्यांकडून येतात, प्रत्येक फोनला तेवढ्याच तत्परतेने प्रतिसाद देत रोहन सुरवसे पाटील त्यांची अडचण तात्काळ दूर व्हावी यासाठी प्रयत्नशील असतात. हेच काम यापुढे देखील आणखी उत्साहाने करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. घरच्यांना वेळ देऊ शकत नसलो तरी त्यांचे पाठबळ नक्कीच सदैव माझ्यामागे असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.