
श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसर पहिल्याच पावसात जलमय; भीमाशंकरकडे जाणारी वाहतूक बंद
रांजणी : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसरात सुरू मुसळधार पावसाचा फटका आता तेथील नागरिकांना बसत आहे. सोमवारी व मंगळवारी दिवसभर कोसळलेल्या पावसानंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने संपूर्ण परिसराला अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. मंदिराच्या चारही बाजूने पाण्याचा वेढा पडल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. नव्याने उभारण्यात आलेल्या सभा मंडपातही पावसाचे पाणी गळू लागल्याने विकासकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
2027 मध्ये नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मंदिर परिसरात विविध विकासकामे युद्ध पातळीवर सुरू आहे. सभा मंडप पायरी मार्ग, मंदिर परिसराचे सुशोभीकरण, पायाभूत सुविधा आणि इतर कामावर गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून काम सुरू आहे. मात्र, या कामामध्ये योग्य नियोजन आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था न केल्याने पहिल्याच जोरदार पावसात त्रुटी उघड झाल्या.
गेल्या पाच महिन्यांपासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी 15 जूनपासून काही नियम व अटींवर दर्शनासाठी खुले केले. मात्र, कामे सुरू असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य व राडारोडा आणि मातीचे ढिग तसेच पडून आहे. त्यामुळे पायरी मार्गावर परिसरातील नैसर्गिक जलनिस:रण व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली. परिणामी, पावसाचे पाणी बाहेर जाण्याऐवजी मंदिर परिसरातच पाणी गेल्याने अनेक ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले.
मंदिरात आलेल्या भाविकांना बसतोय फटका
मंदिरात दर्शनासाठी आलेले भाविक, निसर्गप्रेमी, स्थानिक नागरिक तसेच व्यावसायिकांना या परिस्थितीचा मोठा फटका बसला. पाण्यातून वाट काढत दर्शनासाठी जावे लागत असल्याने अनेक भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पायऱ्यांवर आणि मार्गावर चिखल झाल्याने घसरून अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
छतामधूनही पावसाचे पाणी
नुकत्याच उभारण्यात आलेल्या नव्या सभा मंडपाच्या छतामधून पावसाचे पाणी गळत असल्याचे निदर्शनास आले. उद्घाटनापूर्वीच गळती सुरु झाल्याने विकासकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत असून घाईघाईने काम पूर्ण करण्यावर भर दिल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ व भाविकांकडून केल्या जात आहे.
भीमाशंकरकडे जाणारा मुख्य रस्ताच पाण्याखाली
मुसळधार पावसामुळे राजगुरुनगर इथून ज्योतिर्लिंग क्षेत्र भीमाशंकरकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे. गुंडाळवाडी इथल्या पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग बंद करण्यात आला आहे.