
पिंपरी-चिंचवडकरांचा पाणीप्रश्न मिटणार! भामा आसखेड प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश
पिंपरी : पिंपरी- चिंचवड शहराची भविष्यातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेता अत्यंत महत्त्वाची ठरणाऱ्या ‘भामा आसखेड पाणीपुरवठा योजने’ची सर्व उर्वरित कामे ठरवून दिलेल्या विहित मुदतीत पूर्ण करा, असे स्पष्ट आणि कडक निर्देश पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. शहराला नियोजित वेळेत या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी पालिका प्रशासन पूर्ण ताकदीने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र शासनाने पिंपरी- चिंचवड शहरासाठी भामा आसखेड धरणातून वर्षाला ६०.७९ दशलक्ष घनमीटर (दररोज सुमारे १६७ दशलक्ष लीटर) इतका पाणी कोटा मंजूर केला आहे. या पालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत भामा आसखेड धरणातून शहरात पाणी आणण्यासाठी विविध टप्प्यांवर वेगाने कामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी (३१ जुलै) प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट देऊन कामांची पाहणी केली व आढावा घेतला.
आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी या पाहणी दौऱ्यादरम्यान भामा आसखेड धरण ते नवलाख उंबरे येथील ‘बी.पी.टी.’पर्यंत १७०० मि.मी. व्यासाची उदंचन नलिका टाकणे, तसेच तेथून देहूपर्यंत १४०० मि.मी. व्यासाची गुरुत्व नलिका बसवण्याच्या कामाची बारकाईने तपासणी केली.
जॅकवेलच्या बांधकामाची सखोल पाहणी
या पाहणीतील मुख्य आकर्षण म्हणजे आयुक्तांनी प्रत्यक्ष धरणाच्या पाण्याच्या खाली असलेल्या तब्बल १०० फूट खोल बोगद्यात उतरून तेथील जॅकवेलच्या बांधकामाची अत्यंत सखोल पाहणी केली. काम वेगाने सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच उर्वरित कामांत गती आणण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता दिपक पाटील, उपअभियंता दिनेश फाटक आणि कनिष्ठ अभियंता स्वप्नील पाटील यांच्यासह संबंधित ठेकेदार कंपन्यांचे प्रतिनिधी व प्रकल्प सल्लागार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“पिंपरी चिंचवड शहराची भविष्यातील पाण्याची गरज भागवण्यासाठी भामा आसखेड पाणीपुरवठा योजना अत्यंत कळीची भूमिका बजावणार आहे. या योजनेतील कोणत्याही कामात गुणवत्ता आणि सुरक्षेशी कसलीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. सर्व कामे दर्जेदार आणि दिलेल्या मुदतीतच पूर्ण झाली पाहिजेत, अशा कडक सूचना अधिकारी व ठेकेदारांना दिल्या आहेत. नागरिकांना या योजनेचा लाभ वेळेत देण्यास पालिकेचे प्राधान्य आहे.” — डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.