पुणे: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित संगमनेरमधील सभेत, भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याने राजकीय वातावरण तापले आहे. राज्यभरात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. वसंतराव देशमुख यांचा निषेध केला जात आहे.
‘बेटी बचाव’ आणि ‘लाडकी बहीण’ चा नारा देणाऱ्या भाजपचा खरा चेहरा भाजप नेत्यांच्या विखारी वक्तव्यातून समोर आला असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. माजी खासदार सुजय विखे पाटील आणि वसंतराव देशमुख यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी मागणी सुरवसे पाटील यांनी केली आहे.
वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेत्या जयश्री थोरात यांच्या बद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांनी तमाम महिला भगिनींचा अपमान केला आहे. यासपीठावर उपस्थित असणाऱ्या कोणत्याही भाजप पदाधिकाऱ्यांनी तसेच सुजय विखे यांनी हे भाषण थांबवायला पाहिजे होते. मात्र, त्यांनी आक्षेपही घेतला नाही आणि देशमुख यांचे भाषणही थांबवले नाही. संगमनेर मधील सभेतून भाजपची आणि विखे कुटुंबाची महिलांबाबत असणारी वृत्ती आणि संस्कृती दिसून आली आहे. हीच का ‘पार्टी विथ डिफरन्स’ असेही सुरवसे पाटील यांनी म्हटले आहे.
वसंतराव देशमुख यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये राजकारण रंगले आहे. मात्र संगमनेरमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे संगमनेर तापले आहे. सुजय विखे पाटील यांच्या युवा मेळाव्यामध्ये प्रचारावेळी वसंतराव देशमुख यांनी मुक्ताफळं उधळली. जयश्री थोरात यांच्यावरुन वादग्रस्त विधान केल्यामुळे आता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
भाजप नेते वसंत देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचा तीव्र विरोध करत कडक कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते. शनिवारी (दि.26) वसंतराव देशमुखांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तेव्हापासून ते फरार होते. त्यामुळे जयश्री थोरात यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता स्थानिक गुन्हे शाखेने वसंत देशमुख यांना पुण्यातून ताब्यात घेतलं आहे.
कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आरोप केला होता की “वसंत देशमुखांना लपवून ठेवलं आहे, त्यांना फरार केलं आहे”. अखेर आज पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. जयश्री थोरात यांच्यावर वादग्रस्त टीका झाल्यानंतर योग्य कारवाई न केल्याने थोरात समर्थकांनी पोलीस स्टेशन बाहेर ठिय़्या आंदोलन केले. रात्रभर त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून होत्या. पोलिसांकडून कारवाई करण्यासाठी दिरंगाई झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.